

नवी दिल्ली ः पंखा सुरू केला की तो गरगर फिरतो, आपल्याला हवा तर लागतेच; पण आजूबाजूला तर कचरा, माती किंवा पिशवी असं काही असेल तर तेसुद्धा उडतं. पण पंख्यावरच धूळ कशी जमा होते, ती हवेने उडत का नाही? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
जेव्हा पंखा फिरतो तेव्हा त्याचे ब्लेडस् हवेच्या कणांसोबत घासले जातात. या घर्षणामुळे पंख्याच्या कडेला एक इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो ज्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात. हवेतील तरंगणाऱ्या कणांचेही इलेक्ट्रिक चार्ज असतात. जेव्हा पंखा आणि हवेतील हे इलेक्ट्रिक चार्ज एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा ते चुंबकासारखे एकमेकांना चिकटतात. त्यामुळे पंख्याच्या ब्लेडस्च्या कडेलाच जास्त धूळ असते. दुसरं म्हणजे फ्लूइड डायनामिक्सचा बाऊंड्री लेअर इफेक्ट. जेव्हा पंखा फिरतो तेव्हा त्याच्या आसपासच्या हवेचा स्तर स्थिर राहतो, यालाचा बाऊंड्री लेअर म्हणतात. या स्तरामध्ये हवेची गती नसते. धुळीचे छोटे कण याच स्तरात अडकतात आणि त्याच्यावर बाहेर फेकण्याचा दाबाचाही परिणाम होत नाही. हळूहळू हे कण एकमेकांवर जमा होतात आणि त्यांचा मोठा लेअर तयार होतो. भारतासारख्या देशात आद्रता जास्त आहे. त्यामुळे इथं धूळ जमा होण्याचा वेग वाढतो. हवेतील आद्रता या कणांना ओलसर बनवते आणि कण ब्लेडस्ना धडकतात तेव्हा ते इतके घट्ट चिकटतात की पंख्याच्या फुल स्पीडमुळेही ते हलत नाहीत.