

लखनौ : देशाच्या बहुतांश भागात सध्या भीषण उष्णता आणि उष्माघाताची लाट पसरली आहे. या हवामानाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, उत्तर प्रदेश काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनाही याच उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लखनौमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरातील सोडियमची पातळी खालावल्याचे समोर आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात जास्त घाम येणे, पाणी कमी पिणे आणि सतत उन्हात राहिल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडतो.
इलेक्ट्रोलाइटस् म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे शरीरातील पेशींच्या कार्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. अनेकदा उन्हाळ्यात आपण फक्त पाणी पिण्याला प्राधान्य देतो, परंतु शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी केवळ पाणी पुरेसे नसते. त्यासोबत सोडियम आणि पोटॅशियमचा योग्य स्तर राखणेही तितकेच गरजेचे असते. सोडियम आपल्या शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यासोबतच नसा आणि स्नायूंच्या कार्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील सोडियमची पातळी सामान्यपेक्षा कमी होण्याच्या स्थितीला ’हाइपोनेट्रेमिया’ असे म्हणतात. आहारात अनियमितता, कमी पाणी पिणे किंवा दीर्घकाळ उन्हात राहिल्यामुळे हा धोका निर्माण होतो.
उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?
चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे किंवा खूप थकवा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
केवळ साधे पाणी न पिता त्यात लिंबू सरबत, ओआरएस किंवा शहाळ्याचे पाणी यांसारख्या इलेक्ट्रोलाइटयुक्त पेयांचा समावेश करा.
कडक उन्हात जाणे टाळा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवा.