लंडन : जगभरात सध्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. एवढंच नव्हे तर याच्या उपचाराकरिता वापरली जाणारी औषधे प्रभावहिन होत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या चोरपावलांनी पसरत असलेल्या धोक्याची वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील आण्विक जीवशास्त्रज्ञ नॉर्मन व्हॅन रिजन यांच्या मते, जागतिक आरोग्य चर्चांमध्ये बुरशीजन्य रोगजनक आणि अँटिफंगल प्रतिरोधकतेच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तातडीचे लक्ष न दिल्यामुळे किंवा कारवाई न केल्यामुळे बुरशीजन्य संक्रमण वर्षाला 6.5 दशलक्ष लोकांना संक्रमित करते. एवढंच नव्हे तर यामुळे दरवर्षी 3.8 दशलक्ष लोकांचा बळी जातो. याकडे लक्ष दिलं नाही तर हा आकडा आणखी धोकादायक बनू शकतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. बुरशीजन्य संसर्गाचा प्रभाव कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना होत आहे. नॉर्मन व्हॅन रिजन आणि शास्त्रज्ञांचा एक आंतरराष्ट्रीय गट सरकार, संशोधन समुदाय आणि फार्मास्युटिकल उद्योगाला ‘बॅक्टेरियाच्या पलीकडे पाहा’ असं आवाहन करत आहे. चीन, नेदरलँडस्, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन या देशांतील संस्थांमधून आलेल्या नॉर्मन व्हॅन रिजन आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगितले की, ‘गेल्या दशकांमध्ये औषधांच्या प्रतिकारशक्तीच्या समस्यांची संख्या पाहता, जीवाणूंकडे असमान लक्ष देणे चिंताजनक आहे. एस्परगिलस फ्युमिगॅटससारख्या बुरशीजन्य रोगाचा फुफ्फुसांवर आणि कॅन्डिडा म्हणजे जीभेवर परिणाम होते. कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेले लोक आणि वृद्ध प्रौढांना सर्वाधिक धोका असतो. जीवाणू आणि विषाणूंच्या तुलनेत बुरशी हे अधिक क्लिष्ट जीव आहेत. ज्यामुळे शरीरातील इतर महत्त्वाच्या पेशींना हानी न करता बुरशीच्या पेशी नष्ट करणारे औषध विकसित करणे शास्त्रज्ञांना कठीण आणि अधिक महाग होते. सध्या अँटिफंगल औषधांचे फक्त चार वर्ग आहेत.