

बीजिंग : आपण आजवर लग्नाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या आहेत; पण एक असे गाव आहे, जिथे अतिशय जुन्या परंपरेने लग्न लावले जाते. तिथे नववधूला लग्नाच्या आधी पुढचा एक किंवा दोन दात काढून टाकावे लागतात. असे केल्यामुळे होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबावर कधीही कोणते संकट येत नाही, असा तिथे समज आहे. ज्या महिलांचे पुढचे दात व्यवस्थित नसतील अशावेळी पाळीव कुत्र्याचे दात काढून टाकले जातात! आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ही अनोखी प्रथा आहे तरी कुठे? चला जाणून घेऊया सविस्तर...
ही अनोखी प्रथा चीनमधील गेलाओ आदिवासी जमातीमध्ये आहे. ‘साऊथ चाईना मॉर्निंग पोस्ट’च्या अहवालानुसार, गेलाओ हा चीन आणि व्हिएतनाममध्ये राहणारा एक समुदाय आहे. 2021 मध्ये चीनमध्ये त्यांची अंदाजे लोकसंख्या 6,77,000 पेक्षा जास्त होती. हा समुदाय मुख्यतः दक्षिण चीनच्या गुईझोऊ प्रांताच्या पश्चिम भागातील गेलाओ स्वायत्त काऊंटीमध्ये राहतो. हे लोक शेतीवर अवलंबून आहेत, त्यांचे मुख्य पीक तांदूळ आहे. गेलाओ आदिवासी गटात नवीन नवरीचे दात काढण्याची ही प्रथा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. याचे सर्वात जुने लिखित पुरावे दक्षिणी सोंग राजवंशाच्या (1127 ते 1279) अभिलेखांमध्ये सापडतात.
जेव्हा एखादी गेलाओ महिला सुमारे 20 वर्षांची होते, तेव्हा तिच्या लग्नाची तयारी सुरू होते. त्यावेळी तिच्या समोरच्या वरच्या दातांपैकी एक किंवा दोन दात जाणीवपूर्वक तोडले जातात. एक प्रसिद्ध लोककथेनुसार, अनेक वर्षांपूर्वी एक गेलाओ महिला लग्नापूर्वी आपल्या समुदायासाठी फळे गोळा करताना खडकावरून पडली होती. यामुळे तिचे दोन समोरचे दात तुटले. तिच्या धैर्य आणि समर्पणाला मान देण्यासाठी, गेलाओ नवरीचे लग्नापूर्वी समोरचे दात काढण्याची प्रथा सुरू झाली. या प्रक्रियेत एक विशेष विधी पाळला जात असे. प्रथम दारूचे भांडे तयार केले जात असे आणि मुलीच्या मामाला घरी आमंत्रित केले जात असे.
नंतर मामा एका छोट्या हातोड्याने दात तोडत असे. जर मामाचा मृत्यू झाला असेल किंवा ते नसतील, तर आईच्या बाजूचे त्याच पिढीचे दुसरे पुरुष नातेवाईक हे करू शकतात. दात काढल्यानंतर, हिरड्यांवर विशेष औषधी पावडर लावली जात असे. जर एखादी गेलाओ महिला या परंपरेतून गेली नाही, तर तिला समुदायात ऊपहासाचा सामना करावा लागू शकतो. दात तोडण्याच्या विचित्र प्रथेमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. काही लोक मानतात की, ही एका अपघाताने सुरू झाली, तर इतरांचे म्हणणे आहे की, समोरचे वरचे दात ठेवणे पतीच्या कुटुंबासाठी दुर्भाग्य आणते, ज्यामुळे संतान होत नाही. कुटुंबाच्या समृद्धीत अडथळा येऊ नये म्हणून लग्नापूर्वी महिलांचे वरचे दात काढावे लागत होते. सध्या ही पद्धत पुष्कळशी कमी झाली आहे.