वॉशिंग्टन : पृथ्वीवरील महासागर आणि जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले पाणी नेमके कुठून आले, हे विज्ञानासाठी आजही एक मोठे कोडे आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, चार अब्ज वर्षांपूर्वी लेट हेवी बॉम्बार्डमेंट काळात कोसळलेल्या धूमकेतू आणि उल्कापातांमुळे पृथ्वीवर पाणी आले. मात्र, युनिव्हर्सिटी स्पेस रिसर्च असोसिएशनच्या (यूएसआरए) नव्या संशोधनाने या सिद्धांताला मोठे आव्हान दिले आहे.
अपोलो मोहिमेतील खडकांचा अभ्यास
शास्त्रज्ञांनी अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावरून आणलेल्या खडकांचा आणि मातीचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला. पृथ्वीवर भूगर्भीय हालचालींमुळे जुने पुरावे नष्ट होतात; मात्र चंद्रावर वातावरण नसल्यामुळे तिथे अब्जावधी वर्षांचा इतिहास गोठलेल्या स्थितीत सुरक्षित आहे. शास्त्रज्ञांनी या खडकांमधील ऑक्सिजन आयसोटोप्सचे विश्लेषण केले.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष
चंद्राच्या पृष्ठभागावर अब्जावधी वर्षांपासून जतन झालेल्या नोंदी दर्शवतात की, या उल्कांनी पृथ्वी-चंद्र प्रणालीला फक्त अल्प प्रमाणातच पाणी पुरवले. संशोधनानुसार, चंद्रावरील मातीमध्ये सुमारे 1 टक्के पदार्थ उल्कांमुळे आलेला असू शकतो. हे प्रामुख्याने कार्बनयुक्त उल्कांमधून आलेले असून, त्यातील पाण्याचे प्रमाण पृथ्वीवरील महासागरांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अपुरे आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71 टक्के भाग महासागरांनी व्यापलेला असला, तरी पाण्याचे एकूण वजन पृथ्वीच्या वस्तुमानाच्या केवळ 0.023 टक्के आहे, तरीही हे प्रमाण खूप मोठे असून, ते फक्त उल्कांमुळे आले असे मानणे आता कठीण झाले आहे. या संशोधनाचा अर्थ असा होतो की, पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळीच किंवा तिच्या अंतर्गत हालचालींतून पाण्याचा मुख्य साठा निर्माण झाला असावा, तो बाहेरील उल्कापातांवर अवलंबून नव्हता.
चंद्रासाठी महत्त्व
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील कायमस्वरूपी सावली असलेल्या प्रदेशात असलेले पाणी भविष्यातील मानवी वस्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नासा आणि इतर अंतराळ संस्था आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साऊथ पोल-ऐटकेन बेसिनमध्ये मानवी तळ उभारण्याचे नियोजन करत आहेत. तिथे असलेले पाण्याचे बर्फ पिण्यासाठी, शेतीसाठी आणि रॉकेट इंधन तयार करण्यासाठी वापरले जाईल. डॉ. टोनी गार्गानो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनामुळे पृथ्वीच्या निर्मितीचा इतिहास आणि ती राहण्यायोग्य कशी झाली, याबद्दलचे नवीन पैलू उलगडले आहेत.

