

नवी दिल्ली ः डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, लघवीचा रंग गडद होणे, शौचाचा रंग फिकट किंवा मातीसारखा होणे, त्वचेला प्रचंड खाज सुटणे, पोटात किंवा पाठीत वेदना होणे, अचानक वजन कमी होणे, मळमळ, उलट्या या सर्व समस्या नेहमी जाणवत असतील, तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण, ही स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. स्वादुपिंड हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अन्नाचे पचन करण्यासाठी आवश्यक पाचक रस तयार करण्यास मदत करतो. जर वेळीच यावर उपाय नाही केला, तर हा कर्करोग हळूहळू यकृत किंवा फुफ्फुसांपर्यंत पसरू शकतो. जे धोकायदायक ठरू शकते. पण, एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कडुनिंब या कर्करोगावर काहीप्रमाणात उपायकारक ठरू शकतो.
स्वादुपिंडाचा कर्करोग सहसा 65 वर्षांवरील व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तसेच एका रिपोर्टमधून असेही समोर आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा कर्करोग होण्याचे प्रमाण काही प्रमाणात अधिक असते. तंबाखूचे सेवन किंवा धूमपान करणे, वजन प्रमाणापेक्षाही अधिक असणे, अतिप्रमाणात मद्यपान करणे, अधिक प्रमाणात लाल मांसाचा आहार घेणे, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन करणे ही स्वादुपिंडाच्या कर्करोगाची मुख्य कारणे असू शकतात. स्वादुपिंड हे पोटाच्या खालच्या बाजूला असते. जे ग््राहण केलेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी पाचक रस तयार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करते. जेव्हा स्वादुपिंडाच्या पेशीच्या डीएनए मध्ये बदल होतात. तेव्हा त्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि त्यांची गाठ तयार होते. जी स्वादुपिंडाच्या कार्यात अडथळा आणते आणि या समस्येचे रूपांतर हळूहळू कर्करोगासारख्या गंभीर आजारात होऊ लागते. हा कर्करोग फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास श्वास घेण्यास अडथळा होऊ शकतो. एडेनोकार्सिनोमा आणि न्यरोएंडोक्राइन ट्यूमर हे याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एका संशोधकातून असे समोर आले आहे की, स्वादुपिंडाच्या कर्करोगाला अटकाव करण्यासाठी कडुनिंब काही प्रमाणात सहाय्यक ठरू शकतो. कडुनिंबामध्ये निंबोलिड नावाचा घटक असतो, जो कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास उपयोगी ठरतो. दरम्यान, कडुनिंबावरील बहुतेक चाचण्या या आतापर्यंत प्रयोगशाळेतील पेशींवर आणि इतर घटकांवर करण्यात आल्या आहेत. मात्र, माणसांवरील याचे नेमके परिणाम आणि सुरक्षित डोस अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत. तरीसुद्धा संशोधकांचे असे म्हणणे आहे की, कडुनिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी सहाय्यक ठरणारे घटक असतात, ज्यामुळे कर्करोग कमी असतानाच त्याचे सेवन केल्यास अधिक फायेदशीर ठरू शकते. मात्र, त्याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.