

वॉशिंग्टन : आपला आवडता चंद्र हळूहळू आणि शांतपणे आपल्यापासून दूर जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून सुमारे ३.८ सेंटिमीटर दूर सरकत आहे. मानवी आयुष्याच्या दृष्टीने हे अंतर खूपच नगण्य वाटत असले, तरी कोट्यवधी वर्षांनंतर याचा परिणाम आपल्या पृथ्वीवर अत्यंत खोल आणि गंभीर होऊ शकतो.
वैज्ञानिक आकडेवारीनुसार, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून ३.८३ सेंटिमीटरने दूर जात आहे. मानवी नखे ज्या वेगाने वाढतात, साधारण त्याच वेगाने हे अंतर वाढत आहे. माणसाच्या ७०-८० वर्षांच्या आयुष्यात हे अंतर अवघे ३ मीटरने वाढते; परंतु कोट्यवधी वर्षांच्या इतिहासाचा विचार केला तर हा बदल खूप मोठा आहे. १९६९ ते १९७१ दरम्यान ‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत नील आर्मस्ट्रॉंग आणि इतर अंतराळवीर जेव्हा चंद्रावर गेले होते, तेव्हा ते तिथे विशेष प्रकारचे आरसे सोडून आले होते. वैज्ञानिक पृथ्वीवरून या आरशांवर लेझरचा प्रकाश टाकतात आणि तो प्रकाश परत येण्यासाठी लागणारा वेळ मोजतात. याच तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्र आपल्यापासून सातत्याने दूर सरकत असल्याचे अचूकपणे समोर आले आहे.
यामागील मुख्य कारण म्हणजे समुद्रातील 'भरती-ओहोटी'. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवरील पाण्याला आपल्याकडे आकर्षित करते. त्याच वेळी, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती अत्यंत वेगाने फिरत असते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे समुद्राचे पाणी चंद्राच्या थोडे पुढे निघून जाते. हे पुढे गेलेले पाणी चंद्राला स्वतःकडे खेचते, ज्यामुळे चंद्राला अतिरिक्त ऊर्जा मिळते. याच ऊर्जेमुळे चंद्र हळूहळू वरच्या कक्षेत सरकतो आणि दूर जात राहतो. चंद्र जसजसा दूर जात आहे, तसतसा तो पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावत आहे. आजपासून एका अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक दिवस अवघ्या १९ तासांचा असायचा. आज तो २४ तासांचा आहे. भविष्यात पृथ्वीच्या फिरण्याचा वेग आणखी सुस्त झाल्यामुळे हे दिवस अधिक मोठे होतील.
आज आपल्याला आकाशात चंद्र आणि सूर्य एकाच आकाराचे दिसतात. म्हणूनच जेव्हा चंद्र सूर्याच्या समोर येतो, तेव्हा तो सूर्याला पूर्णपणे झाकून टाकतो. परंतु, दूर गेल्यामुळे चंद्र आकाशात लहान दिसू लागेल. साधारण ६०० दशलक्ष (६० कोटी) वर्षांनंतर चंद्र इतका लहान दिसेल की तो सूर्याला कधीही पूर्णपणे झाकू शकणार नाही. म्हणजेच पृथ्वीवरून खग्रास सूर्यग्रहणाचे दर्शन कायमचे बंद होईल. चंद्राचे अंतर वाढल्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर कमकुवत होऊ लागेल. याचा थेट परिणाम आपल्या समुद्रांवर होईल. समुद्रात उठणाऱ्या उंच लाटा आणि भरती-ओहोटीची तीव्रता खूपच कमी होईल. यामुळे किनारी भागातील परिसंस्था (Ecosystem) आणि समुद्री जीवांवर मोठा परिणाम होऊ शकतो.