

बागपत : महाभारतात वर्णन आहे की, पांडवांनी युद्ध टाळण्यासाठी कौरवांकडे केवळ पाच गावे मागितली होती. त्यामध्ये इंद्रप्रस्थ (सध्याच्या दिल्लीचा परिसर), पाणीप्रस्थ (सध्याचे पानीपत), सोणप्रस्थ (सध्याचे सोनपत), तिळप्रस्थ (सध्याचे तिलपत) आणि व्याघ्रप्रस्थ (सध्याचे बागपत) यांचा समावेश होता. उत्तर प्रदेशातील याच बागपत जिल्ह्यातील सिसाना गावात इतिहासाच्या पानांना उजाळा देणारा एक महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. खंडवारी वनक्षेत्रात खोदकाम करताना सुमारे चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचे म्हणजेच महाभारताच्या काळातील अवशेष आणि कलाकृती सापडल्या आहेत. या दुर्मीळ शोधामुळे इतिहासकार आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांमध्ये मोठा उत्साह आहे.
उत्खनन स्थळाची पाहणी आणि पुढील तपास करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India - ASI), मेरठचे चार सदस्यीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ते पुढील कार्यवाही करेल. यमुना नदीच्या किनार्यावर असलेल्या एका प्राचीन टेकडीच्या खोदकामादरम्यान विटांनी बांधलेले अनेक साचे आणि काही आकृत्या आढळून आल्या आहेत. या अवशेषांची पाहणी करण्यासाठी शहजाद राय संशोधन संस्थेचे संचालक आणि प्रसिद्ध इतिहासकार डॉ. अमित राय जैन पोहोचले. डॉ. जैन यांनी असा दावा केला आहे की, हे स्थळ महाभारतकालीन मानवी वस्तीचे अवशेष असू शकतात. त्यांचे म्हणणे आहे की, येथे मिळालेली भांडी, चूल आणि बांधकामाचे साचे हे ‘पेंटेड ग्रे वेअर कल्चर’ (Painted Grey Ware Culture - चित्रकलायुक्त धूसर मृद्भांड संस्कृती) शी जुळतात.
ही संस्कृती महाभारतकालीन सभ्यतेचा भाग मानली जाते. इतिहासकार अमित राय जैन यांच्या मते, हे काही मंदिर नसून, त्या काळात असलेल्या मानवी वस्तीच्या प्राचीन स्थापत्यकलेचा हा नमुना आहे. त्यांनी या अवशेषांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) कडे पाठवला असून, संस्कृती मंत्रालयाकडे या जागेच्या अधिकृत उत्खननाची परवानगी मागितली आहे. ही बातमी वार्यासारखी पसरताच आजूबाजूच्या गावांमधून हजारो नागरिक हे प्राचीन अवशेष पाहण्यासाठी सिसाना येथे पोहोचले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर ‘एएसआय’च्या पथकाने या स्थळाचे सखोल सर्वेक्षण केले, तर हा शोध भारतीय सभ्यतेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडू शकतो.