

पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी आतापर्यंत अनेक प्राचीन संस्कृतींचा उलगडा केला असला, तरी काही मोठी साम्राज्ये आणि त्यांच्या राजधानीची शहरे आजही एक रहस्य बनून राहिली आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये या शहरांचे सविस्तर वर्णन असूनही, प्रत्यक्षात ती जमिनीखाली नेमकी कुठे गाडली गेली आहेत, याचा पत्ता लागलेला नाही. धक्कादायक म्हणजे, यातील काही शहरांचा सुगावा चोरांना लागला असून, त्यांनी तिथून अमूल्य वस्तूंची लूट केली आहे. मात्र, त्यांनी या जागांचे रहस्य उघड केलेले नाही. अशाच 6 ‘हरवलेल्या’ शहरांचा आढावा...
इरिसाग्रिग ः 2003 च्या इराक युद्धानंतर जागतिक बाजारपेठेत ‘इरिसाग्रिग’ शहराशी संबंधित हजारो प्राचीन मातीच्या पाट्या (टॅब्लेटस्) दिसू लागल्या. यावरून हे शहर साधारण 4,000 वर्षांपूर्वी इराकमध्ये अस्तित्वात असल्याचे समजते. या पाट्यांवरील नोंदीनुसार, येथील राजवाड्यांमध्ये अनेक कुत्रे पाळले जात असत. इतकेच नव्हे, तर तिथे सिंहदेखील पाळले जात. जरी चोरांनी हे शहर शोधून लूट केली असली, तरी पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अद्याप या शहराचे नेमके स्थान सापडलेले नाही.
इटजटावी ः इजिप्तचा फॅरो अमेनेमहत प्रथम याने ही राजधानी वसवली होती. ‘दोन देशांवर ताबा मिळवणारा’ असा या नावाचा अर्थ होतो. इसवी सन पूर्व 1981 ते 1640 पर्यंत हे शहर इजिप्तची राजधानी होते. संशोधकांच्या मते हे शहर मध्य इजिप्तमधील ‘लिश्ट’ जवळ असावे. कारण, तिथे या फॅरोचा पिरॅमिड आणि अनेक शाही थडगी सापडली आहेत. परंतु, शहराचे अवशेष अद्याप गवसलेले नाहीत.
अक्कड ः अक्कड हे अक्कडियन साम्राज्याची राजधानी होती, जे इसवी सन पूर्व 2350 ते 2150 दरम्यान भरभराटीला आले होते. या साम्राज्याचा विस्तार पर्शियन आखातापासून अनाटोलियापर्यंत होता. या शहरात ‘इश्तार’ देवीचे भव्य मंदिर होते. अक्कडियन साम्राज्य लयाला गेल्यावर हे शहर उद्ध्वस्त झाले किंवा लोकांनी सोडून दिले. हे शहर सध्याच्या इराकमध्ये कुठेतरी दडलेले असावे, असा अंदाज आहे.
अल-याहुदु ः बॅबिलोनियन साम्राज्यात ज्यू लोक जिथे राहत असत, त्या शहराला ‘अल-याहुदु’ (ज्युडाचे शहर) म्हटले जाई. इसवी सन पूर्व 587 मध्ये राजा नेबुचॅडनेझर द्वितीय याने ज्युडावर विजय मिळवल्यानंतर तिथल्या लोकांना येथे स्थलांतरित केले होते. या वस्तीतील सुमारे 200 मातीच्या पाट्या सापडल्या आहेत, ज्यातून येथील लोकांच्या श्रद्धेविषयी माहिती मिळते. हे शहरदेखील आधुनिक इराकमध्ये असण्याची शक्यता आहे, ज्याची आधीच लूट झाली असावी, असे मानले जाते.