Loneliness memory loss risk | एकटेपणामुळे निर्माण होतात विस्मरणाच्या समस्या

Loneliness memory loss risk |
Loneliness memory loss risk | एकटेपणामुळे निर्माण होतात विस्मरणाच्या समस्याWestend61
Published on
Updated on

लंडन : एकटेपणा ही अशी भावना आहे, जिचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आयुष्यात कधी ना कधी येतोच. ही एक नैसर्गिक भावना असून, तो कोणताही स्वभावदोष नाही. मात्र, एकटेपणाचा आपल्या विचार करण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर शांतपणे परिणाम होऊ शकतो. ‘एकटेपणामुळे स्मृतिभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोका वाढतो का?’ यावर संशोधकांमध्ये दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. मात्र, एकटेपणाने स्मरणशक्तीच्या काही समस्या दिसल्या, तरी त्यामुळे स्मृतिभ्रंश होतो, असे पुरावे आढळले नाहीत.

‘एजिंग अँड मेंटल हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनानुसार, हे प्रकरण वाटते तितके साधे नसून त्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे पैलू आहेत. प्रथम ‘स्मृतिभ्रंश’ म्हणजे नक्की काय हे समजून घेणे आवश्यक आहे. स्मृतिभ्रंश हा कोणताही एक विशिष्ट आजार नसून ती अनेक लक्षणांसाठी वापरली जाणारी एक संज्ञा आहे. यात अल्झायमर हा सर्वात परिचित आजार आहे. यामुळे स्मरणशक्ती जाणे, गोंधळ उडणे, भाषेच्या वापरात अडचणी येणे आणि हळूहळू स्वावलंबन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. दुसरीकडे, ‘बोधनात्मक घट’ (Cognitive Decline) म्हणजे मानसिक कार्याची गती मंदावणे. या दोन संज्ञा अनेकदा एकाच अर्थाने वापरल्या जातात; पण त्या तशा नाहीत.

स्मृतिभ्रंश विकसित न होताही व्यक्तीला बोधनात्मक घटीचा अनुभव येऊ शकतो. अल्झायमर नेमका कशामुळे होतो, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. निरोगी जीवनशैलीमुळे याचा धोका कमी होतो हे सत्य असले, तरी ती कोणतीही खात्री नाही. अनेक लोक सर्व नियमांचे पालन करूनही या आजाराला बळी पडतात. हा आजार अनुवांशिकता, वाढते वय आणि काही जैविक घटकांवर अवलंबून असतो, ज्याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. या नवीन अभ्यासात 65 ते 94 वयोगटातील 10,000 हून अधिक प्रौढांचा सहा वर्षांपर्यंत मागोवा घेण्यात आला. अभ्यासाच्या सुरुवातीला हे सर्वजण निरोगी, स्वावलंबी आणि स्मृतिभ्रंशमुक्त होते. संशोधकांनी या काळात त्यांच्या स्मरणशक्तीवर देखरेख ठेवली आणि त्यात एकटेपणाची काय भूमिका आहे, याचा शोध घेतला.

संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे : एकटेपणा आणि स्मरणशक्ती : एकटेपणामुळे स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होतात, असे दिसून आले. स्मृतिभ्रंशाचा पुरावा नाही : एकटेपणामुळे थेट ‘स्मृतिभ्रंश’ होतो, याचा कोणताही ठोस पुरावा संशोधकांना आढळला नाही. स्मरणशक्तीच्या समस्या आणि स्मृतिभ्रंश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोघांची गल्लत केल्यामुळे लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होते. संशोधकांनी हा सूक्ष्म फरक स्पष्ट केला असून, तो समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news