

मुंबई : आज रस्त्यावर निघालं, तर दर काही किलोमीटरवर आपल्याला पेट्रोल पंप दिसतात, जे पूर्णपणे डिजिटल पद्धतीने काम करतात; पण तुम्हाला माहीत आहे का, की भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा पेट्रोल पंप कुठे सुरू झाला होता आणि तो कसा काम करायचा? यामागची कहाणी खूपच रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊया, देशातील पहिल्या पेट्रोल पंपाची गोष्ट.
भारतातील पहिला पेट्रोल पंप ९८ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९२८ मध्ये मुंबईत सुरू झाला होता. हा देशातील पहिला सार्वजनिक इंधन केंद्र (फ्यूल स्टेशन) होता आणि याचे श्रेय 'बर्मा शेल' कंपनीला जाते. राष्ट्रीयीकरणानंतर ही कंपनी 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) चा भाग बनली. त्या काळात आजच्यासारखी रस्त्यांवर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत नव्हती. कारण, गाडी खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नव्हते. अशा परिस्थितीत देशात पहिला पेट्रोल पंप सुरू होणे हे एक ऐतिहासिक पाऊल होते. पेट्रोल पंप सुरू होण्यापूर्वी इंधन मोठ्या ड्रममध्ये आणि टीनच्या डब्यांमध्ये विकले जायचे. पण, जेव्हा पहिला पेट्रोल पंप सुरू झाला, तेव्हा लोकांची ही अडचण दूर झाली आणि लोकांना एकाच ठिकाणी सहजपणे आपल्या गाड्यांसाठी पेट्रोल खरेदी करता येऊ लागले.
आज आपण पेट्रोल पंपावर गेलो, तर गाडीच्या फ्यूल टँकमध्ये नोझल टाकले जाते आणि आपल्याला हवे तितके पेट्रोल डिजिटल पद्धतीने भरून मिळते; परंतु पूर्वी असे होत नव्हते. त्या काळात पेट्रोल पंपावर आजच्यासारखी आधुनिक यंत्रे नव्हती. कर्मचारी हाताने चालणाऱ्या डिस्पेंसरचा वापर करायचे आणि पेट्रोलचे प्रमाण मोजण्यासाठी मेकॅनिकल मीटर्सचा वापर केला जायचा. आजच्यासारखे स्क्रीनवर पेट्रोलचे प्रमाण आणि किंमत लगेच दिसत नव्हती. त्यामुळे पारदर्शकता राखणे हे कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी बर्मा शेल कंपनीने पुढे जाऊन अशा उपकरणांचा वापर सुरू केला, ज्यामध्ये ग्राहक स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत होते की ,त्यांना किती प्रमाणात पेट्रोल मिळत आहे. यातूनच आधुनिक पेट्रोल पंपाचा पाया रचला गेला.