

नवी दिल्ली : जून महिना उजाडला की, मान्सूनचे वेध लागतात. बळीराजा शेतीच्या कामांना सुरुवात करतो. निसर्गही पावसाच्या आगमनासाठी आतूर असतो. डोक्यावर काळे ढग जमा झाले की, पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी सर्वच सज्ज होतात; पण ढगातून पावसाचा एक थेंब जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागतो माहिती आहे का?
मान्सूनने यंदा वेळेआधीच देशात धडक दिली आहे. मे महिन्यात पाऊस सरी अनेक ठिकाणी कोसळल्या आहेत. पावसाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे; पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? पावसाच्या एका थेंबाला जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? किती वेगाने खाली येतो?
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला उत्तर युके हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. वेबसाईटनुसार, थेंबाच्या आकाराबद्दल अचूक माहिती देणे कठीण आहे; पण पावसाचे थेंब सरासरी 14 कि.मी. प्रतितास वेगाने जमिनीकडे येतात. पावसाचे मोठे थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी सुमारे 2 मिनिटे लागतात. लहान थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी 7 मिनिटे लागतात. मोठे थेंब तासी 20 किलोमीटर वेगाने पृथ्वीवर पोहोचतात. त्यामुळे कधीकधी 10 मिनिटे पाऊस पडला, तरी पाणी ठिकठिकाणी साचते.
भारतातील मेघालयातील मावसिनराम येथे सर्वाधिक पाऊस पडतो. येथे सरासरी वार्षिक पाऊस 11,871 मि.मी. आहे, जो जगात सर्वाधिक आहे. हे ठिकाण पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे आणि समुद्रसपाटीपासून 1400 मीटर उंचीवर आहे.
पावसाचे थेंब गोल का असतात, यामागील विज्ञान समजून घेऊया! थेंब उंचावरून येतात तेव्हा ते गोलाकारात येतात. कारण, पाण्याचे रेणू पृष्ठभागावरील ताणामुळे एकत्र धरले जातात; पण पडल्यानंतर इतर पावसाच्या थेंबांशी आदळल्याने त्यांचा आकार बदलतो. हवेच्या प्रतिकारामुळे थेंबाचा तळ सपाट होतो आणि जेली बीनच्या आकारासारखा वक्र होतो.