

लंडन : आज आपल्याला दिसणारी हिरवीगार आणि निळीशार पृथ्वी करोडो वर्षांपूर्वी अशीच होती का? विज्ञानाच्या जगात जेव्हा आपण भूतकाळाची पाने उलटतो, तेव्हा एक वेगळेच चित्र समोर येते. सुमारे 70 कोटी वर्षांपूर्वी आपली ही पृथ्वी एका पांढर्याशुभ्र ‘आईसबॉल’ किंवा बर्फाच्या गोळ्यात रूपांतरित झाली होती. उत्तर ध्रुवापासून ते विषुववृत्तापर्यंत सर्वत्र फक्त बर्फच बर्फ होता; पण हे घडले कसे? हे कोडं आता शास्त्रज्ञांनी सोडवलं आहे.
अनेकांना वाटतं की, केवळ सूर्याची उष्णता कमी झाल्यामुळे पृथ्वी गोठली असावी; पण नॉर्वेच्या आर्क्टिक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक धक्कादायक सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते, पृथ्वीला बर्फात बदलणारा मुख्य घटक हा ‘मीठ’ होता. प्राध्यापक मार्टिन रिपडल आणि त्यांच्या टीमच्या मते, जेव्हा समुद्राचे पाणी गोठते, तेव्हा त्यातून मिठाचे स्फटिक बाहेर पडतात. अतिशय कमी तापमानात हे स्फटिक बर्फावर एक पांढरा थर तयार करतात. हा थर सामान्य बर्फापेक्षाही जास्त चमकदार असतो, जो एखाद्या आरशाप्रमाणे काम करतो. यामुळे सूर्याची उष्णता शोषली जाण्याऐवजी पुन्हा अंतराळात परावर्तित झाली आणि पृथ्वीचे तापमान झपाट्याने कोसळले. वैज्ञानिक प्रक्रियेनुसार, मिठाने पृथ्वीला गोठवण्यासाठी अशी मदत केली :
मिठाचा ढीग : त्या काळी उष्णता इतकी कमी होती की, बर्फ वितळण्याऐवजी थेट वायू रूपात उडून जात असे. मात्र, बर्फ उडून गेला तरी मागे मिठाचा जाड थर उरत असे. सुपरचार्ज्ड थंडी : समुद्री मिठात वेगवेगळे रेणू असतात. काही मीठ 8 अंश सेल्सिअसवर गोठते, तर काही 36 अंशांवर. जशी थंडी वाढली, तसे नवनवीन प्रकारचे मीठ गोठू लागले आणि त्यांनी थंडीला अधिक वेग दिला. CO2 चे समीकरण बदलले : आतापर्यंत असे मानले जात होते की, ‘स्नोबॉल अर्थ’ होण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड खूप कमी असावा लागतो; पण या ‘सॉल्ट थिअरी’मुळे आता सामान्य कार्बन डायऑक्साईड पातळीवरही पृथ्वी गोठणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.