

हैदराबाद : काही काही गावांचे स्वतःचे वेगळेच वैशिष्ट्य असते. जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गाव, संस्कृत बोलणार्या लोकांचे गाव अशी अनेक गावं प्रसिद्ध आहेत. तेलंगणात असं एक गाव आहे, जिथे गावकर्यांना गेल्या 40 वर्षांपासून निरंतर गरम पाणी मिळतंय, तेही 24 तास! हे आता गरम पाण्याचे गाव म्हणूनच ओळखले जाते.
तेलंगणातील कोथागुडेम जिल्ह्यातील मनुगुरू मंडलमधील पागीलेरू गावातील काही बोअरवेलमधून मागील 40 वर्षांपासून सातत्यानं गरम पाणी येतंय. या भागात मोठा खनिजसाठा आहे. 40 वर्षांपूर्वी एका कंपनीच्या लोकांनी येथे खाणीची चाचणी करण्यासाठी खोदकाम केलं. काही ठिकाणी हजार ते 2 हजार मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं. यातीलच एका बोअरवेलच्या खड्ड्यात अचानक गरम पाण्याचा झरा लागला. तेव्हापासून आजतागायत गरम पाणी निघतच आहे. त्या बोअरवेलच्या खड्ड्यातून पाणी 40 वर्षांपासून निघतंय, कोणत्याही मोटर किंवा मशिनविना दिवसभर 24 तास गरम पाणी वाहत राहतं. या बोअरवेलच्या खड्ड्यातून निघणार्या पाण्याचं तापमान 60 डिग्री सेल्सिअस असते. जवळपास 40 वर्षांपूर्वी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या लोकांनीही पागीलेरू गावानजीक 8 ठिकाणी खोदकाम केलं, जवळपास एक किलोमीटर खोलपर्यंत बोअरहोल खोदकाम करण्यात आले. या भागात भूऔष्णिक ऊर्जा असल्याचे संकेत त्यांना मिळाले होते. म्हणून त्यांनी खोदकाम सुरू केलं. यातील एका खड्ड्यात गरम पाण्याचा झरा लागला आणि तेव्हापासून गरम पाणी येतच आहे. पृथ्वीच्या आतील थरांत जास्त उष्णता असते. पृथ्वीच्या गर्भात अनेक खोल दर्या, मोठमोठाल्या भेगा आहेत. त्यामुळे एक ते दोन किलोमीटरपर्यंत खोलात गरम पाण्याचा स्रोत असू शकतो. पागीलेरूमध्ये खोदकाम केलेल्या खड्ड्यात गरम पाण्याचा झरा लागण्याचं हे ही एक कारण असू शकतं. पण, या रहस्यावर अजूनही अभ्यास आणि संशोधन सुरू आहे.