

पॅरिस : फ्रान्स-भारत सांस्कृतिक सहकार्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण नुकताच पॅरिसमध्ये साकार झाला. बुसी-साँ-झॉर्ज येथे उभारल्या जाणार्या नव्या हिंदू मंदिरासाठी भारतातून आलेल्या पहिल्या दगडांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या समारंभाने फ्रान्समधील आपल्या प्रकारातील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्याच्या पुढील टप्प्याची सुरुवात झाली. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर प्राचीन कारागिरीच्या पद्धती आणि सामायिक कौशल्यांच्या आधारे बांधले जाणार आहे. भारतामधून आणलेले आणि पारंपरिक तंत्रांनी तयार केलेले हे दगड शतकानुशतके जपल्या गेलेल्या वास्तुकलेच्या वारशाचे प्रतीक आहेत. यातील काही निवडक दगड भारतातील कुशल कारागिरांनी हाताने कोरले आहेत, ज्यामध्ये पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या प्राचीन पद्धती जपल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांचा फ्रान्सकडे प्रवास सुरू झाला.
फ्रान्समध्ये भारतीय कारागीर फ्रेंच दगडकाम तज्ज्ञांसोबत काम करतील, ज्यात नोट्रे-डाम कॅथेड्रलच्या पुनर्बांधणीमध्ये सहभागी असलेले कारागीरही आहेत आणि अशाप्रकारे भारतीय कोरीव परंपरा व फ्रान्सची सुप्रसिद्ध दगडकाम कौशल्ये एकत्र येतील. हा समारंभ केवळ पारंपरिक पद्धतीने कोरलेल्या दगडांच्या आगमनापुरता मर्यादित नव्हता; तो संस्कृती, मूल्ये आणि ज्ञान यांच्या संगमाचे प्रतीक होता. हे मंदिर केवळ उपासनेसाठीच नव्हे, तर संस्कृती, शिक्षण आणि समुदाय सहभागासाठी समर्पित जागा निर्माण करण्याच्या व्यापक द़ृष्टिकोनाचा भाग आहे.
पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचे चिरस्थायी प्रतीक ठरेल. स्थानिक व राष्ट्रीय प्रतिनिधी तसेच समुदाय नेते या समारंभास उपस्थित होते आणि फ्रान्ससाठी या प्रकल्पाचे महत्त्व व आंतरसांस्कृतिक समज वाढवण्यात त्याची भूमिका याची त्यांनी दखल घेतली. पॅरिस मंदिर बांधकाम प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि BAPS UK Europe चे विश्वस्त संजय कारा यांनी सांगितले. ‘भारतामधून आलेल्या पहिल्या दगडांचे आगमन हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. प्रत्येक दगडात वारसा, काळजी आणि उद्देश दडलेला आहे.
सामायिक आदर आणि सहकार्याच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि फ्रेंच अभियांत्रिकी यांचा संगम यातून दिसून येतो. सेवा, नम्रता आणि सलोखा यावर भर देणार्या महंत स्वामी महाराज यांच्या मूल्ये व द़ृष्टिकोनाने मार्गदर्शित होत, भारतीय आणि फ्रेंच तज्ज्ञांना एकत्र आणणार्या या प्रकल्पाचा भाग होणे हा सन्मान आहे. हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नव्हे, तर व्यापक समाजासाठीही संस्कृती, शिक्षण आणि सौहार्दाचे केंद्र बनेल,’ असे संजय कारा म्हणाले.