

नवी दिल्ली : झोप ही एक अशी बाब आहे जी सगळ्यांनाच प्रिय असते. काही लोकांसाठी झोप म्हणजे स्वर्गसुख... पण हे सुख पैशाने विकत घेता येत नाही... पुरेशी आणि चांगली झोप आपल्या मशिनरूपी शरीरासाठीसुद्धा महत्त्वाची असते, पण हल्ली बदललेल्या लाईफस्टाईलमुळे आणि धावपळीच्या जीवनामुळे सगळ्यांनाच पुरेशी झोप मिळते असे नाही. अलीकडे अनेकांना झोपेसंबंधी अनेक समस्या बघायला मिळतात. जसे की, रात्री लवकर झोप लागत नाही, झोप घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की, मग दिवसभर सतत झोप आल्यासारखे वाटत राहते. आळस येत राहतो. आपल्यासोबतही अनेकदा असे होत असेल, पण असे का होते याचे कारण आपल्याला माहीत नसेल. यामागचे कारण एका व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. ते कोणते हे जाणून घेऊया...
रात्री झोप पूर्ण झाली नाही, अशी तक्रार बहुतेक लोक दुसर्या दिवशी सकाळी करतात, पण हे काही सामान्य लक्षण नाही. ही समस्या होण्यामागे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असू शकते. हे व्हिटॅमिन शरीरात कमी झाले की, झोपेसंबंधी वेगवेगळ्या समस्या आपो आप डोके वर काढतात. अशात हे व्हिटॅमिन कमी झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात हेही जाणून घेऊ.
रात्रभर झोपूनही दिवसभर सुस्ती जाणवत असेल किंवा सतत झोप येत असेल तर हे लक्षण व्हिटॅमिन बी-12 कमी झाल्याचे आहे. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे शरीरात ऊर्जा कमी निर्माण होते. याचा अर्थ हा आहे की, सतत थकवा आणि कमजोरी जाणवत राहते. सतत झोप येत राहते. आळस येतो.
हात किंवा पायांमध्ये सुई टोचल्यासारखे जाणवणे किंवा सुन्नपणा व झिणझिण्या जाणवणे अशी लक्षणे ही व्हिटॅमिन बी-12 कमी झाल्यावर दिसू शकतात. त्याशिवाय व्हिटॅमिन बी-12 कमी झाल्याने चिडचिडसुद्धा जाणवते. इतकेच नाही तर त्वचेचा रंग जर पिवळा दिसत असेल तर हेही व्हिटॅमिन बी-12 कमी झाल्याचे लक्षण आहे.
व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दूर करण्यासाठी डाएट प्लानमध्ये बदल करणे फार गरजेचे आहे. दूध, दही, पनीर आणि लोणी यांसारख्या डेअरी प्रॉडक्टस्चा आहारात समावेश करून या व्हिटॅमिनची कमतरता दूर करू शकता. चांगला परिणाम मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य आहाराची निवड करणे खूप महत्त्वाचे ठरेल. यासाठी आपण डॉक्टरांचादेखील सल्ला घेऊ शकता.