

गंगोत्री : कोट्यवधी भारतीयांसाठी पवित्र असलेल्या गंगा नदीचे उगमस्थान म्हणजे ‘गोमुख’. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण केवळ एक भौगोलिक आश्चर्य नसून, ते श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. मात्र, हवामान बदलाच्या वाढत्या संकटामुळे आणि गंगोत्री हिमनदीच्या (Glacier) वेगाने वितळण्यामुळे गोमुखाचे स्वरूप बदलत असून, त्यावर गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात, समुद्रसपाटीपासून सुमारे 13,200 फूट उंचीवर गंगोत्री हिमनदीचे टोक आहे. या टोकाचा आकार गायीच्या मुखासारखा दिसतो, म्हणूनच याला ‘गोमुख’ असे नाव पडले. येथूनच भागीरथी नदीचा उगम होतो, जी पुढे देवप्रयाग येथे अलकनंदा नदीला मिळाल्यानंतर ‘गंगा’ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी हजारो भाविक आणि गिर्यारोहक अत्यंत खडतर प्रवास करून या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी येतात.
गेल्या काही दशकांपासून गोमुख आणि संपूर्ण गंगोत्री हिमनदी अभूतपूर्व बदलांना सामोरे जात आहे. शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांनी यामागील अनेक गंभीर कारणांवर प्रकाश टाकला आहे. जागतिक तापमानवाढीचा थेट परिणाम हिमालयातील हिमनद्यांवर होत आहे. अभ्यासानुसार, गंगोत्री हिमनदी दरवर्षी सरासरी 20 ते 30 मीटरने मागे सरकत आहे. यामुळे गोमुखाचा आकार सतत बदलत असून, त्याचे मूळ स्वरूप नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हिमनदी मागे सरकल्यामुळे आजूबाजूचे डोंगर आणि खडक अस्थिर झाले आहेत.
यामुळे गोमुखाच्या तोंडाशी आणि यात्रा मार्गावर वारंवार भूस्खलन आणि खडक कोसळण्याच्या घटना घडत आहेत. 2013 आणि 2016 मध्ये झालेल्या मोठ्या भूस्खलनांमुळे गोमुखाचा दर्शनी भाग पूर्णपणे कोसळला होता. वाढत्या पर्यटनामुळे आणि यात्रेकरूंच्या गर्दीमुळे या संवेदनशील परिसरात प्रदूषण वाढत आहे. प्लास्टिक आणि इतर कचर्यामुळे येथील नैसर्गिक पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. अस्थिर हवामान आणि भूस्खलनामुळे गोमुखपर्यंतचा 14 किलोमीटरचा ट्रेक अधिकच धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासनाला अनेकदा यात्रेकरूंच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे लागते आणि काही वेळा यात्रा थांबवावी लागते.