

नवी दिल्ली ः भारतीय स्वयंपाकघरात ‘चक्रफूल’ हा मसाल्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे, तर आरोग्याच्या द़ृष्टीनेही चक्रफूल अत्यंत फायदेशीर आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आयुर्वेदानुसार, यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
चक्रफूलमध्ये मिनरल्स, अँटिऑक्सिडंटस् आणि व्हिटॅमिन्स आढळतात. रोजच्या आहारात चक्रफूल समाविष्ट केल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. याचे सेवन आपण काढा, चहा किंवा जेवणातील मसाल्याच्या स्वरूपात करू शकतो. ऋतू बदलताना सर्दी, खोकला आणि ताप या समस्या सामान्य आहेत. अशा वेळी चक्रफूल उपयोगी ठरते. यामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. शरीरात कुठेही सूज किंवा दुखणे असल्यास, चक्रफूल किंवा त्याची पूड मोहरीच्या तेलात मिसळून लावल्यास आराम मिळतो. रोजच्या आहारात चक्रफुलाचा समावेश केल्याने अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी संबंधित समस्यांवरही फायदा होतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये कामाचा ताण आणि मोबाईल-लॅपटॉपसारख्या गॅजेटस्वरची अवलंबित्व वाढली आहेत, ज्यामुळे अनिद्रा (झोप न येणे) ही एक सामान्य समस्या बनली आहे. पण, चक्रफूल अनिद्रेशी लढण्यासही मदत करतं. यामधील पोषक घटक शरीराला शांत झोप मिळण्यास मदत करतात.