

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात इंटरनेट ही केवळ एक सोय राहिलेली नाही, तर ते आधुनिक जगाची जीवनरेखा बनले आहे. आर्थिक व्यवहार, संवाद, आरोग्यसेवा, आणि ऊर्जा प्रणाली सर्वकाही इंटरनेटवर अवलंबून आहे. मात्र, तज्ज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की, ही संपूर्ण प्रणाली अत्यंत नाजूक आणि संभाव्य धोक्यांनी वेढलेली आहे. मग इंटरनेट बंद होऊ शकते का? असा जर प्रश्न कुणी विचारला, तर त्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. तरीही इंटरनेट बंद पडणे हे तात्पुरते किंवा मोठ्या प्रमाणात असू शकते. संपूर्ण जागतिक इंटरनेट एकाच वेळी कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे; परंतु असे काही गंभीर धोके आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रदेशात इंटरनेट सेवा ठप्प होऊ शकते. ते धोके पुढीलप्रमाणे...
पायाभूत सुविधांवरचे थेट हल्ले : इंटरनेट प्रामुख्याने समुद्राखालून टाकलेल्या ऑप्टिक फायबर केबल्स आणि मोठ्या डेटा सेंटर्सवर चालते. मासेमारीचे ट्रॉलर्स, अँकर्स किंवा नैसर्गिक भूकंपांमुळे समुद्राखालील केबल्स तुटल्यास खंड किंवा देश इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटी वेगळे पडू शकतात. सायबर गुन्हेगार किंवा सायबर माफियांच्या टोळ्यांकडून होणारे मोठे सायबर हल्ले इंटरनेटला धोका पोहोचवू शकतात. सायबर माफिया मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स किंवा महत्त्वपूर्ण नोडस् लक्ष्य करून सेवा खंडित करू शकतात.
भू-चुंबकीय वादळे : हा सर्वात मोठा आणि अनपेक्षित नैसर्गिक धोका आहे. सूर्यमालेतील शक्तिशाली सौर वादळे जेव्हा पृथ्वीच्या दिशेने येतात, तेव्हा ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संवाद साधतात. या वादळामुळे मोठे भू-चुंबकीय प्रवाह निर्माण होतात. यामुळे ट्रान्सफॉर्मर्स आणि इंटरनेटशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निकामी होऊ शकतात. 1 आणि 2 सप्टेंबर 1859 रोजी मोठे सौर वादळ आले होते. त्याला ‘कॅरिंग्टन इव्हेंट’ म्हणतात. असे सौर वादळ पुन्हा आले तर मोठे पॉवर ग्रिडस् आणि समुद्राखालील केबल्सचे मोठे भाग खराब होऊ शकतात, ज्यामुळे अनेक आठवडे किंवा महिने इंटरनेट बंद पडू शकते.
मानवी चुका आणि अपघात : अनेकदा इंटरनेट खंडित होण्यामागे कोणतेही कारण नसते तर मानवी चूक असते. एकावेळी मोठी सर्व्हर प्रणाली अपडेट करताना झालेली चूक किंवा चुकीच्या ठिकाणी केबल तोडल्यास मोठे शटडाऊन होऊ शकते. त्यामुळे इंटरनेट बंद पडू शकते.
कमकुवत समन्वय : इंटरनेटची मालकी आणि नियंत्रण कोणत्याही एका संस्थेकडे नाही; ते हजारो कंपन्या आणि सरकारांमध्ये विभागलेले आहे. यामुळे संकटकाळात तातडीने समन्वय साधून दुरुस्ती करणे कठीण होते. थोडक्यात, इंटरनेटची प्रणाली मजबूत असली, तरी ती ज्या केबल्स आणि वीज प्रणालीवर अवलंबून आहे, त्या अत्यंत नाजूक आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर किंवा प्रादेशिक स्तरावर इंटरनेट दीर्घकाळ बंद होण्याची शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही.