

लंडन : आजच्या काळात भारतीय उपखंडातील लोकांसाठी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम हे एक परिचित शहर असले तरी, या शहराने एकेकाळी मुस्लिम राजवटीतील भारताच्या औद्योगिक महत्त्वाकांक्षांना दिशा दिली होती, हे अनेकांना माहीत नसेल. ईस्ट इंडिया कंपनीने 1786 मध्ये बर्मिंगहॅममधील दोन उद्योगपतींना कोट्यवधी नाणी बनवण्याचे काम दिले. या एका घटनेने भारत आणि इंग्लंडमधील एका नव्या औद्योगिक नात्याची पायाभरणी केली.
बर्मिंगहॅममधील प्रसिद्ध उद्योगपती मॅथ्यू बोल्टन आणि जेम्स वॅट यांनी त्यांच्या ‘सोहो वर्क्स’ कारखान्यात वाफेच्या इंजिनचा वापर करून ही नाणी तयार केली. पुढच्या काही दशकांत त्यांनी तब्बल 22 कोटींहून अधिक नाणी तयार केली, ज्यावर मुघल राजवटीतून घेतलेली सुंदर पर्शियन लिपी कोरलेली होती. ही नाणी बर्मिंगहॅमच्या कालव्यातून बोटींद्वारे कोलकात्याला पाठवली जात असत. या घटनेने बर्मिंगहॅम आणि भारतीय उपखंडादरम्यान एका ऐतिहासिक संबंधाची मुहूर्तमेढ रोवली.
हे केवळ नाणी बनवण्यापुरते मर्यादित नव्हते. बर्मिंगहॅमच्या या औद्योगिक यशामुळे ते ‘हजारो उद्योगांचे शहर’ (सिटी ऑफ ए थाऊंजडस् ट्रेडस्) म्हणून ओळखले जाऊ लागले. या शहराकडून प्रेरणा घेण्यासाठी भारतातील अनेक मुस्लिम शासकांनी युरोपच्या दौर्यादरम्यान बर्मिंगहॅमला आवर्जून भेट दिली. या भेटींमागे त्यांचे औद्योगिक तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रक्रिया समजून घेणे, आपल्या राज्यात आधुनिक कारखाने कसे उभारावेत याचे ज्ञान मिळवणे, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी औद्योगिकीकरणाचे महत्त्व ओळखणे हे प्रमुख उद्देश होते. त्यामुळे बर्मिंगहॅम आणि भारताचे नाते केवळ व्यापारापुरते मर्यादित नव्हते, तर ते ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे प्रतीक होते. नाण्यांच्या रूपाने सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक भारतीय राज्यांसाठी औद्योगिक प्रगतीचा मार्गदर्शक ठरला आणि या शहराने भारताच्या आधुनिकीकरणात नकळतपणे महत्त्वाची भूमिका बजावली.