

नवी दिल्ली : आपल्याकडे मृग नक्षत्र सुरू झाले की, शेवग्याची भाजी बनवून खाण्याची प्रथा आहे. मात्र, केवळ मृग नक्षत्रात किंवा पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभर कधीही शेवग्याच्या पानांची भाजी खाणे आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला लाभदायक ठरतात, असे तज्ज्ञ सांगतात.
शेवग्याच्या पानात व्हिटॅमिन्स ए, सी, ई, आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटिन आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषकतत्त्व मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. शेवग्याच्या पानात अँटी ऑक्सिडेंट तत्त्वांचा खजिना आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच शरीर आजारांचा योग्य प्रकारे सामना करू शकते. शेवग्याची पाने सकाळी उपाशी पोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण राहाण्यास मदत मिळते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास सहायक ठरते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनयंत्रणादेखील चांगली रहाते. यामुळे बद्धकोष्ठतादेखील दूर रहाते, अन्य पचनासंदर्भातील आजारही दूर होतात. या पानात व्हिटॅमिन्स ए आणि ईचे प्रमाण जादा असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले होते. त्वचेला सुरुकत्या होण्याचे प्रमाणदेखील कमी होते. शेवग्याच्या पाने मेटाबॉलिझ्म म्हणजेच चयापचय क्रिया वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहाते. याच्या सेवनामुळे भूक कमी होते आणि शरीरातील ऊर्जा वाढते. शेवग्याच्या पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहाते. त्यामुळे मधुमेह असणार्यांना ही पाने चघळल्याने फायदा होतो. मानसिक आरोग्यासाठीही शेवग्याची पाने चांगली असतात. यातील तत्त्वे तणाव आणि चिंता दूर करतात. यातील अँटिऑक्सिडेंट घटकांमुळे शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढण्यास मदत करते. हे शरीराला डिटॉक्सिफाय करते. अनेक रोगांचा बचाव करते.