निम्मी भूक फळे, भाज्यांनी भागवणे लाभदायक | पुढारी

निम्मी भूक फळे, भाज्यांनी भागवणे लाभदायक

वॉशिंग्टन : ‘लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार जगभरात होणार्‍या दर पाचपैकी एका मृत्यूमागे चुकीची आहारपद्धती आणि त्यामुळे उद्भवणारे आजार जबाबदार असतात. सध्या लहान मुले आणि तरुणांमध्येही लठ्ठपणा, टाईप-2 मधुमेह, हृदयरोग तसेच अनेक प्रकारचे कर्करोग दिसून येत आहेत. त्यामुळे योग्य आहार-विहाराकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निम्मी भूक ही फळे आणि भाज्यांच्या सेवनानेच भागवावी असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत दोन ते 19 वर्षे वयाच्या 19 टक्के आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सुमारे 40 टक्के लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे. त्यामुळे टाईप-2 मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो. अशावेळी योग्य आहार कसा असतो हा प्रश्‍न निर्माण होतो. आहाराचे जर 2ः1ः1 असे प्रमाण ठरवले तर हे समजून घेणे सोपे जाते. विज्ञानानुसार जर आपण खाण्याच्या दोन भागात फळे आणि भाज्या घेत असाल आणि बाकी एक-एक भागात प्रोटिन व कार्बोहायड्रेटयुक्‍त आहार घेत असाल तर ही आदर्श स्थिती ठरते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली अर्धी भूक ही फळे व भाज्यांनीच भागवली जावी. एकूण आहाराचा 50 टक्के भाग म्हणजे दोन भाग हे फळे व भाज्यांचे असावेत. त्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अन्य पोषक घटक मिळतात. अतिरिक्‍त खाण्याचा 25 टक्के हिस्सा कार्बोहायट्रेटने पूर्ण करावा. त्यामुळे शरीराला ग्लुकोज म्हणजेच शर्करा मिळते व ती शरीरात ऊर्जेचे काम करते. शरीराच्या संचालनासाठी 60 टक्के ऊर्जा यामधूनच मिळते. अन्य 25 टक्के भाग प्रोटिनने पूर्ण करावा.

Back to top button