

नवी दिल्ली ः जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतीय शहरांचा क्रमांक लागतो, हे लाजीरवाणे सत्य आहे. म्हणूनच एका भारतीय स्टार्टअपने दुचाकी चालकांना प्रदूषित हवेपासून वाचवण्यासाठी खास हेल्मेट तयार केले आहे. हे हेल्मेट स्वतःच हवा शुद्ध करतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. कडक उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहतात तेव्हा तर नको ती हेल्मेटची कटकट असे वाटते. त्यामुळे एअर प्युरिफायर असलेले हेल्मेट स्कूटर-बाईकस्वारांसाठी जणू वरदानच ठरणार आहे.
जगभर प्रदूषण ही मोठी समस्या आहे. भारतातही एअर प्युरिफायरची मागणी वाढत आहे. आता तर कार कंपन्याही नवीन कारमध्ये केबिन एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसवत आहेत. मात्र, दुचाकी चालकांबाबत अशी कुठलीही सोय झाली नव्हती. तथापि, एका भारतीय स्टार्टअपने असे हेल्मेट तयार करण्यात यश मिळवले आहे, जे रायडरचे संरक्षण करण्यासोबतच हवा शुद्ध करते. स्कूटर आणि बाईकस्वारांना भारतीय रस्त्यांवरील सर्वात भयानक प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत 80 टक्के प्रदूषक घटक फिल्टर करण्याचा दावा करत एअर प्युरिफायर असलेले हेल्मेट बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.
एचटी ऑटोच्या मते, भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे, की हे हेल्मेट दुचाकीस्वारांना मोकळा श्वास घेण्यासाठी ताजी व शुद्ध हवा देण्यास सक्षम आहे. यात एअर प्युरिफिकेशन युनिट (हवा शुद्ध करणारी यंत्रणा) बसविण्यात आले आहे. हे बदलता येण्यासारखे फिल्टर असून त्यामध्ये बॅटरीवर चालणारा पंखा बसवला आहे. हेल्मेटचे एअर प्युरिफायर 6 तासांपर्यंत टिकू शकते. हे हेल्मेट चार्ज करण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहे.