आणखी काहीच वर्षे खाऊ शकाल चॉकलेट
नवी दिल्ली : जगभरात बहुतेक लोकांना 'चॉकलेट' हमखास आवडत असते. जर तुम्हालाही चॉकलेट आवडत असेल तर पुढील काही वर्षेच तुम्ही हा आवडता पदार्थ खाऊ शकाल. यामुळे आताच जितके चॉकलेट खाता येईल तितके खा, असा सल्लाच तज्ज्ञांनी दिला आहे.
केवळ भारताचाच विचार करावयाचा झाल्यास आपल्या देशात वर्षागणिक चॉकलेटचा खप वाढत आहे. देशात 2002 मध्ये चॉकलेटचा खप 1.64 लाख टन होता. मात्र, 2013 मध्ये तो तब्बल 2.28 लाख टनावर पोहोचला. मात्र, लवकरच या चॉकलेट उद्योगावर संकटाचे ढग जमा होणार आहेत. हे ढग 'ग्लोबल वॉर्मिंग'च्या रूपात येत आहे.
विशेषज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे चॉकलेटसाठी वापरण्यात येणारे कोक पुढील काही वर्षांत नाहीसे होणार आहे. 'यूएस नॅशनल ओसिएनिक अँड अॅटमोस्फेअरिक अॅडमिनिस्ट्रेशन'च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या अहवालातील माहितीनुसार ज्या वेगाने जागतिक तापमान वाढत आहे, ते पाहता पुढील 40 वर्षांत जगातून चॉकलेटच नाहिसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चॉकलेटचे प्रमुख स्रोत कोकोच्या उत्पादनासाठी किमान 20 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान असावे लागते. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वर्षागणिक तापमान वाढत आहे. यामुळे भविष्यात 20 अंशांपेक्षा कमी तापमानाची उपयुक्त ठिकाणे उपलब्ध होणे अवघड बनणार आहे. यामुळे येत्या 40 वर्षांत चॉकलेट नामशेष होणार, तसेच ते प्रचंड महागही होण्याची शक्यता आहे.