नवी दिल्ली : सर्वात उंच पूल, सर्वात लांब बोगदे वगैरे लोकांचे लक्ष वेधून घेत असतातच. आता आपल्याच देशात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कटडा-बनिहालदरम्यान रियासी येथे हा पूल उभा केला जात आहे. चिनाब नदीवरील हा पूल लवकरच खुला होईल अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच दिली होती. हा पूल नदीपासून 359 मीटर उंचीवर आहे.
पॅरिसच्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही हा पूल उंच आहे. त्याची लांबी 1.315 किलोमीटर इतकी आहे. या पुलाला इंद्रधनुष्यासारखी 476 मीटर कमानही बसवलेली आहे. काश्मीर खोर्याला देशाशी रेल्वेमार्गाने जोडणारा हा भव्य पूल आहे. यामुळे स्थानिक लोकांसाठी अनेक नव्या संधी खुल्या होतील. शेकडो किलोमीटरचा वळसा या पुलामुळे वाचणार आहे. भूकंप आणि मोठे स्फोट सहन करण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. पूल अधिक उंच असल्याने वेगाने वाहणारा वारा हे त्याच्यासमोरील एक आव्हान असेल. ताशी 266 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्याचा सामना या पुलास करावा लागेल. पुलाचे आयुर्मान किमान 120 वर्षे असेल. आधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना म्हणून या पुलाकडे पाहिले जात आहे.