

बीड: आखाती देशांमधील युद्धाचे ढग आता केवळ इंधन आणि गॅसपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचे पडसाद थेट तुमच्या खिशावर आणि तहान भागवणाऱ्या 'मिनरल वॉटर'वर उमटताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. बाटलीबंद पाण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक बाटल्या, त्यांच्या कॅप्स (टोपण) आणि लेबलसाठी लागणारा कच्चा माल (पॉलिमर) हा प्रामुख्याने क्रूड ऑईलच्या (कच्च्या तेलाच्या) रिफायनरीमधून मिळतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका प्लास्टिक निर्मिती उद्योगाला बसला आहे.लातूर, संभाजीनगर, सिन्नर आणि पुणे यांसारख्या मोठ्या केंद्रांमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. कच्च्या मालाच्या दरात प्रति किलोमागे तब्बल ५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने बाटलीबंद पाणी महागण्याची शक्यता आहे.