बारामती : पुढारी वृत्तसेवा
म्युकर मायकोसिसचे नवे संकट राज्यावर ओढवले आहे. या आजाराचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. अनेक रुग्णांसाठी हा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळेच राज्य सरकारने हा आजार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केला आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अधिक वाचा : कोल्हापुरात आज मध्यरात्रीपासून एकदम कडक लॉकडाऊन; काय चालू आणि काय बंद राहणार?
बारामतीत शनिवारी (दि. 15) कोरोना निर्मुलन आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे मुंबईत जाताच या प्रश्नी लक्ष घालणार असून इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अधिक वाचा : आता देवेंद्र फडणवीसांकडून थेट सोनिया गांधीना पत्र; म्हणाले, 'ये पब्लिक है, सब जानती है!'
लसी अभावी केंद्रे सातत्याने बंद राहत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, गरजेएवढी लस देशाला उपलब्ध होत नाही, हे दुदैव आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भारत बायोटेकला पुण्यात जागा उपलब्ध करून दिली आहे. ही कंपनी तेथे लवकरच लस उत्पादन सुरु करेल. सीरमचे उत्पादन सुरुच आहे. परंतु मागणी वाढल्याने नाईलाजाने 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण थांबवावे लागले. 45 वर्षापुढील व्यक्तिंना दुसरा डोस देण्याचे सध्या नियोजन आहे. लस उपलब्ध होताच ती शहरी, ग्रामीण भागापर्यंत पुरवली जाईल. लसीसाठी राज्याने 6 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्याचा प्रयत्न आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांवर नेण्यात आला. यामागे काही रिसर्च असेल, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा : फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? नवाब मलिकांचा पलटवार
रासायनिक खतांच्या किमती वाढण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी स्फुरद पालाशचा वापर करावा. युरीया न वापरता एनपीकेचा वापर करावा. केंद्राने खतांच्या किमती कमी करत इतर वेगवेगळी खते शेतकऱयांना द्यावीत असेही पवार म्हणाले.
चक्रीवादळाचा धोका
राज्याला चक्री वादळाचा धोका आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या नैसर्गिक संकटाबाबत किनारपट्टीवरील नागरिक, मासेमारी करणाऱयांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला असल्याचे पवार म्हणाले.
अण्णा बनसोडे प्रकरणात चौकशी सुरु
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी पुण्यातील बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पुण्याचे पोलिस आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत या घटनेबद्दल माहिती घेण्यात आली. सध्या चौकशी सुरु आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे पवार यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.