निपाणी : मधुकर पाटील
महाराष्ट्र सरकारने कोरोना बाबतीत लॉकडाऊनमध्ये पाच टप्प्यांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून कर्नाटकात येणार्या प्रवाशांचा ओढा यामुळे वाढला आहे. परिणामी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी तपासणी नाक्यावर ताण वाढला असून प्रत्येक प्रवाशाची चौकशी केली जात आहे.
कर्नाटकात 14 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोगनोळी तपासणी नाक्यावर लॉकडाऊन मार्गसूचीचे काटेकोर पालन केले जात आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना नियम काटेकोर केले जात असल्याने प्रवासी व प्रशासकीय अधिकार्यांत वादाचे प्रसंग घडत आहेत.
अधिक वाचा : डायनासोर'चा सर्वात मोठा जीवाश्म ऑस्ट्रेलियात सापडला; जाणून घ्या संपूर्ण संशोधनाची कथा
केवळ अत्यावश्यक सेवा देणार्या वाहनांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. शासकीय कर्मचारी, नोकरदारांना कारण विचारुन सोडले जात आहे. पण, इतरांना प्रवेशास मज्जाव केला जात आहे. सध्या कर्नाटकामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन आहे. तर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन नियमांमध्ये पाच टप्प्यांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औद्योगिक वसाहत कागल, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी तसेच दैनंदिन बँकांचे व्यवहार, रुग्णालय व औषध व दूध पुरवठा, किराणा माल वाहतूक सुरू आहे. या व्यतिरिक्त इतर वाहनांना सोडण्यात आलेले नाही. अत्यावश्यक सेवा देणार्यांकडे आवश्यक कागदपत्रे असल्याबाबत तपासणी केली जात आहे.
इतर ठिकाणी काम करणार्यांना अथवा विनाकरण ये-जा करणार्यांना तसेच आरटीपीसीआर ई-पास च्या आधारे कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात येत आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या सूचनेचे पालन केले जात आहे. केवळ अत्यावश्यक कारणासाठीच महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.