मुंबई; पुढारी ऑनलाईन: पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधे एमके स्टॅलिन यांना विजय मिळवून देणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (ता.१२) भेट घेतली. त्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावण्यास सुरूवात झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर भाष्य करत भेटीमागचा खुलासा केला आहे.
प्रशांत किशोर आणि पवार यांच्यातील बैठक ३ तास चालली. त्यांच्या या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतिकार म्हणून त्यांची नेमणूक होईल या चर्चेला उत आला. मात्र, नवाब मलिक यांनी या चर्चा फेटाळून लावत बैठकीमध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, पवार साहेबांना विरोधी पक्षांना एकत्र करण्याची इच्छा आहे. आगामी काळात या उद्देशाने प्रयत्न केले जातील. असे मलिक यांनी यावेळी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत किशोर यांनी एनसीपीसाठी काम करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. पण पवार पारंपारिक राजकारण सोडायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली नाही. मात्र, बंगालमध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केलेले दावे आणि ममता बॅनर्जींसाठी आखलेली रणनीती यामुळे ममतादीदींना मोठं यश आलं. त्याची देशभर चर्चा झाल्याने प्रशांत किशोर कोणतीही लाट परतवून लावू शकतात, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळेच पवारांनी आज प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली असावी असं सांगितलं जात आहे.
भाजपने बंगालमधे १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी माझं काम सोडेन, अशी प्रतिज्ञा प्रशांत किशोर यांनी केली होती, पण तसं काहीच घडलं नाही. त्यांचं भाकीत खरं ठरूनदेखील त्यांनी विजयाच्या शिखरावर असताना स्ट्रॅटेजी आखण्याच्या कामातून संन्यास घेतला आहे.