नागपूर : पुढारी वृत्तसेवा ;भाजपचे माजी आमदार आणि प्रदेश पदाधिकारी असलेले अमरावतीचे डॉ. सुनिल देशमुख यांनी स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. सात वर्ष भाजपावासी झालेले डॉ. देशमुख यांची १९ जुनला घरवापसी होणार आहे. येत्या १९ जुन रोजी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या वाढदिवशी त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनात डॉ. देशमुखांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
अधिक वाचा : मंत्री बच्चू कडूंना मिळाले युट्यूबचे 'सिल्वर' बटण!
मुळचे काँग्रेसी असलेले डॉ. सुनिल देशमुख यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजय मिळवून पाच वर्ष आमदारकी भुषवली. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी देशमुख यांचा पराभव केला. देशमुख यांच्यासमवेत त्यांचे अनेक सहकारी भाजपत गेले होते. मुळचाच काँग्रेसी विचारधारेचा असल्याने काँग्रेसमध्ये परतत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
अधिक वाचा : 'ईडी'कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी
२०१४ मध्येही अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत काँग्रेसची तिकीट मिळेल म्हणून वाट बघितली. मात्र राजकिय अपरिहार्यता म्हणून अखेर भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागली असे देशमुख यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षामध्येही मला नेहमीच सन्मान मिळाला आहे. केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही मला सन्मानाची वागणूक देऊन आदराचे स्थान दिले.
अधिक वाचा : तालिबान्यांना फॉलो करणाऱ्या अफगाणी नागरिकाला घेतले ताब्यात
मात्र माझ्या सोबत भाजपत आलेले सर्वच जण मुळचे काँग्रेसचे आहेत. ते सर्वच जण मी काँग्रेसमध्ये परतण्यासाठी आग्रही होते. आणि अखील भारतीय काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचाही मी काँग्रेसमध्ये परत यावे असा आग्रह होता. सोनिया गांधी यांच्या आशिर्वादानेच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे डॉ देशमुख यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षा पेक्षा काँग्रेसमध्ये अधिक जोमाने काम करण्याची संधी असल्याने मी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ सुनिल देशमुख यांनी सांगितले.