बीड; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. मागील पन्नास वर्षापासून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी धर्मप्रसार केला.
अधिक वाचा : उस्मानाबाद : अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश
संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक विविध टिव्ही चॅनेलवर त्यांचे कीर्तने ऐकत असत. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी असणारे बाबासाहेब महाराज इंगळे यांनी इंगळे महाराज परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून चिंचवडगाव परिसरातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, पिंपरखेड, देवडी, काडीवडगाव, चिंचोटी या पंचक्रोशीतील गावांना सोबत घेऊन धार्मिक वातावरणाला चालना दिली होती.
परिसरातील सर्व गावांना ते आपलेच गाव मानीत होते. या परिसरातील गावांमध्ये आठ आठ दिवस राहून अखंड हरिनाम सप्ताह करणारे महाराज या भागातील सर्वांसाठी कुटुंबातील सदस्य वाटत होते. विनोदी शैलीने किर्तन करुन दृष्टांत सांगून सिद्धांत पटवून देणारे महाराष्ट्रातील पहिले कीर्तनकार होत. त्यांचे धार्मिक विधी पुस्तक महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील घरा-घरात त्यांची एक विनोदी कीर्तनकार म्हणून मोठी ओळख निर्माण झाली होती. महाराज निघून गेल्यामुळे या परिसरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराजांचे आठवण ही कायम येत राहील अशा भावना सोशल मिडीयावर हजारो भक्त व्यक्त करत आहेत.