लातूर : पुढारी
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात शहरात तीन दिवस दिवसरात्र आंदोलन सुरू झाले असून, हे आंदोलन राजकीय नसून सामाजिक जनांदोलन आहे. त्यामुळे सदर कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणत 'मै नही जानता, मै नही मानता' अशा शायराना अंदाजात प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगडी यांनी येथे आपला आवाज बुलंद केला.
या कायद्याविरोधात येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कवर मुव्हमेंट अगेंस्ट सीएए एनआरसी एनपीआर लातूरच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी प्रतापगडी म्हणाले, सदर कायदे संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध आहेत. या कायद्याविरोधात नागरिक स्वत: आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार जिद्द सोडायला तयार नाही. ही लढाई तानाशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. विदेशी नागरिकांना नागरीकत्व देण्याबाबतचा कायदा 1955 पासून देशात आहे.या कायद्याअंतर्गत वर्षभरात जवळपास चार हजार नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले आहे. सरकारने आता आणलेल्या सीएए एनआरसी, एनपीआर कायद्याचा दुष्परिणाम देशाने आसाममध्ये बघितला आहे. या कायद्यांतर्गत 19 लाख नागरिकांना नागरिकत्व रजिस्टरमधून बाहेर ठेवले. या कायद्याविरोधात गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्व जाती धर्माचे लोक आंदोलन करीत आहेत.यावर जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिमाचे रूप दिले जात आहे असे ते म्हणाले.
सभेदरम्यान 'इन्कलाब जिंदाबाद,हम लेके रहेंगें आजादी, हल्लाबोल,हम कागज नहीं दिखाएगें ' च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनासाठी सरफराज मणियार,मौलाना ईस्राईल रशीदी,कलीम कुरेशी, अँड मुहम्मदअली शेख,मोहम्मद गौस सय्यद,अन्वर शेख, जुनेद आतार,करीम पठाण आदींनी पुढाकार घेतला आहे.