नवी मुंबई : पुढारी वृतसेवा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज गुरूवारी मुंबई एपीएमसीतील घाऊक भाजीपाला आणि फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राज्य आणि परराज्यातील शेतक-यांनी बुधवारी रात्री बारा वाजल्यानंतर आतापर्यंत एकही शेतमाल भरलेली गाडी एपीएमसी मार्केट मध्ये पाठवली नाही. यामुळे आवक व जावक शून्य ठरली. मुंबईसह उपनगरात बुधवारी जेवढा भाजीपाला आणि फळे रवाना केली तेवढीच जावक झाली आहे. शेतक-यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती सचिव अनिल चव्हाण यांनी पुढारीशी बोलताना दिली.
आज गुरूवारी घाऊक भाजीपाला आणि फळ मार्केट बंद ठेवल्याने पुर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट असून केवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई युध्दपातळीवर केली जात आहे. सर्व गाळे धुवून काढले जात आहेत. त्यामुळे दोन दिवस आधीच एपीएमसी प्रशासनाने शेतक-यांना मार्केट बंद ठेवले जाणार असल्याने शेतमाल पाठवू नये असे आवाहन केले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री बारा ते बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कांदा बटाटा मार्केटमध्ये २६८ गाड्यांची आवक झाली होती तर २६९ गाडी कांदा बटाटा शहरात पाठवला होता. भाजीपाल्याची ८०३ गाड्यांची विक्रमी आवक झाली. त्यापैकी ४५२ गाडी भाजीपाला मुंबईत रवाना केला होता. फळ मार्केटमध्ये दोन दिवस एकही गाडी माल आला नाही आणि मुंबईत पाठवला नाही. मसाला मार्केटमध्ये २८५ गाड्यांची आवक झाली होती. १८९ गाडी माल रवाना केला होता. तर दाणा मार्केटमध्ये ३६३ गाडी माल आला होता. ४७८ गाडी माल मुंबईत पाठवला गेला होता.
वाचा-'तर रेल्वेच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागेल'
गुरूवारी कांदा बटाटा मार्केटमध्ये २९२ गाडी कांदा बटाटा आला असून मुंबई शहरात सकाळी १२ वाजेपर्यंत २६९ गाडी रवाना केली आहे. भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये आवक आणि जावक पूर्ण शून्य असून एकही गाडी शेतमाल आलेला नाही. मसाला मार्केटमध्ये १३७ गाड्यांची आवक झाली असून केवळ १५ गाडी माल घेऊन मुंबईत दाखल झाल्या. तर दाणा मार्केटमध्ये ३०१ गाड्यांची आवक झाली असून केवळ २८ गाड्या मुंबईत पाठवण्यात आल्या.