![विठ्ठल कारखाना](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा विठ्ठल कारखान्यापुढे अभिजित पाटील महत्त्वाचा नसून कारखाना महत्त्वाचा आहे. कारखाना चांगला चालला पाहिजे. तीन वर्षांत दोनवेळा कारखाना बंद पाडून हे दोन्ही दादा 12 वर्षे मिळून सत्तेत होते. त्यावेळी दोघांच्या उदासीन कारभारामुळे हा कारखाना बंद पडला आहे. सभासदांना औदुंबरअण्णांच्या काळाप्रमाणे सोन्याचे दिवस यायचे असतील तर सभासदांनी एकदाच मतरुपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंती श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे अभिजित पाटील यांनी केली.
पळशी व सुपली येथील सभेत ते बोलत होते. सध्या पंढरपूर तालुक्यातील वेणूनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भालके गट, सत्ताधारी गटातून वेगळा झालेला युवराज पाटील गट व प्रमुख विरोधक असलेला अभिजीत पाटील यांचा गट या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अभिजीत पाटील म्हणाले की, कारखान्याचा खरा मालक सभासद शेतकरीच आहे. मात्र काहीजण आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपला वारसा सांगून लोकांना फसवत आहेत. मात्र यामुळे सभासद फसणार नाही, तो या लोकांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखविल्याशिवाय राहणार नाही.ह्यांनी शेकडो कोटींची कर्जे आपल्या जवळच्या लोकांच्या नावे घेऊन कारखाना बुडवण्याचे पाप केले आहे. आज तेच लोकं ज्यांच्याकडे पैसे आहेत ते सभांना उपस्थित दिसत असल्याचे सांगीतले.यावेळी हणमंत पाटील, नंदकुमार बागल, धनंजय बागल, सुभाष दादा भोसले, धनंजय काळे, राजाराम बापू सावंत, दत्ता नागणे, दत्ताभाऊ व्यवहारे, दशरथ बाबा जाधव, प्रा. मस्के, सचिन पाटील यांसह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद उपस्थित होते.