पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमधील नवा विक्रमादित्य, असे बिरुद मागील काही वर्ष मिरवणारा भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli ) आज (दि.१७) पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात तो शून्यवर तंबूत परतला. विराटच्या पुन्हा एकदा अपयश आल्याने चाहत्यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. त्याने एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. ( India vs New Zealand 1st Test )
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांना विराट कोहलीकडून (virat kohli) मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र कोहलीने चाहत्यांची निराशा केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओरूर्कने त्याला ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. ( India vs New Zealand 1st Test ) विराट कोहली हा ३८ वेळा शून्यवर बाद झाला आहे. सध्या खेळत असणार्या म्हणजे सक्रीय फलंदाजांमध्ये तो सर्वाधिक वेळा शून्यवर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. विराट पाठोपाठ रोहित शर्माचा नंबर आहे. तो ३३ वेळा शून्यवर बाद झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराटला चकमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात केवळ १७ धावा केल्या, तर कानपूरमध्ये त्याने पहिल्या डावात ४७ आणि दुसऱ्या डावात नाबाद २९ धावा केल्या होत्या. ( India vs New Zealand 1st Test )
मागील ११ महिन्यांचा विचार करता कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची कामगिरी असमाधानकारच राहिली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये शेवटचे अर्धशतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ७६ धावांची दमदार खेळी केली होती. यावर्षीच्या प्रारंभी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो संघाचा भाग नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला केवळ ९९ धावा करता आल्या होत्या. कोहलीला मागील ८ डावात केवळ एकदाच अर्धशतक झळकावता आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर २७ हजार धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २९ शतके झळकावली आहेत. त्याने आतापर्यंत कसोटीत 8947 धावा केल्या आहेत. २०२१ पासून कोहलीने २८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याला २१ वेळा फिरकीपटूंनी पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. तर वेगवान गोलंदाजांनी त्याला २४ वेळा बाद केले होते. पण अलीकडच्या काळात, विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सरासरीची आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासह संपूर्ण देशवासियांना त्याच्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा आहे.