

मुंबई : वृत्तसंस्था : झिम्बाब्वेच्या भूमीवर विश्वविजेतेपदाचा झेंडा फडकवून भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघ रविवारी मायदेशी परतला. सहाव्यांदा विश्वचषक उंचावणार्या या युवा वीरांचे मुंबई विमानतळावर असंख्य चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात जंगी स्वागत केले.
कर्णधार आयुष म्हात्रे, सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि यष्टिरक्षक अभिज्ञान कुंडू हे विमानतळावर आकर्षणाचे केंद्र ठरले. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आयुषच्या स्वागतासाठी त्याचे कुटुंबीय, निकटवर्तीय जातीने उपस्थित होते. अंतिम सामन्यात आयुषने 53 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
आमच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. मुलांनी गेली अनेक वर्षे जे अपार कष्ट घेतले, त्याचे आज फळ मिळाले आहे, अशा भावना आयुषचे वडील योगेश म्हात्रे यांनी व्यक्त केल्या. तर त्याच्या आईने, तो लहानपणापासूनच क्रिकेटवेडा आहे, आज त्याने देशासाठी विश्वचषक आणला याचा सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
ऋषीकेश कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या या संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. सुपर सिक्समध्ये पाकिस्तानलाही नमवणार्या या संघासाठी ‘बीसीसीआय’ने 7.5 कोटी रुपयांच्या रोख इनामाची घोषणा केली आहे. या खेळाडूंचा विशेष सत्कार सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे.