पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा डकवर्थ-लुईस नियमानुसार 7 गडी राखून पराभव केला. तसेच या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 8 षटकात 78 धावांचे लक्ष्य होते. भारताने ते 6.3 षटकात 3 गडी गमावून 81 धावा करून जिंकले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका विजयाने सुरुवात केली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर मालिका जिंकून प्रशिक्षक म्हणून आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीला सुरुवात केली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना मंगळवारी (दि.30) पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे.
भारताकडून धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज यशस्वी जैस्वालसह डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनला खातेही उघडता आले नाही. शुभमन गिलच्या जागी संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. मानेच्या दुखण्यामुळे गिल या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. त्यावेळी यशस्वीने 30 धावा केल्या तर कर्णधार सूर्याने 12 चेंडूत 26 धावांची विस्फोटक खेळी केली. यासोबतच हार्दिक पंड्या 18 धावा करून नाबाद परतला तर पंतने नाबाद 2 धावा केल्या.
161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने पुन्हा दणका दिला. तेव्हा भारतीय संघाच्या धावसंख्येत केवळ 6 धावांची भर पडली. यानंतर भारतीय संघाला 8 षटकांत 78 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. या सामन्यात नाणेफेकही उशिरा झाली. पावसामुळे आऊटफील्ड ओले असल्याने टॉसलाही उशीर झाला.