पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयाला संजू सॅमसन आणि कर्णधार सुर्यकुमारने सार्थ ठरवले. संजू सॅमसमनने 40 चेंडूत तडाकेबाज शतक झळकावले तर सूर्याने 75 धावांची धडाकेबाज खेळी केली. यानंतर रियान पराग आणि हार्दिक पांड्याने धावांची गती कायम ठेवली. अखेर भारताने 20 षटकांत 297 धावांत मजळ मारली. ही धावसंख्या भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. परंतु, टी-20 मधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी केल्यामुळे पॉवरप्लेअखेर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात 82 धावा केल्या. टी-20 मधील पॉवरप्लेमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार आणि सॅमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. भारताने सलामीवीर अभिषेक शर्माची विकेट लवकर गमावली होती, परंतु सूर्यकुमार आणि सॅमसन यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या सहा षटकांत बांगलादेशच्या गोलंदाजांवर कहर आजमावला. 14व्या षटकामध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो मेहदी हसनकरवी झेलबाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार सुर्यादेखील 15व्या षटकामध्ये बाद झाला.
भारताचा सलामीवीर संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत रिशाद हुसेनचा सामना केला. 10वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रिशादवर सॅमसनने सलग पाच चेंडूत पाच षटकार ठोकले आणि एकूण 30 धावा केल्या. सॅमसनने पहिल्या चेंडूवर एकही धाव काढली नाही, तर पुढचे पाच चेंडू सीमारेषा ओलांडून पाठवले.
संजू सॅमसनच्या आक्रमक फलंदाजीदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवनेही शानदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे भारताने 11व्या षटकातच 160 धावांचा टप्पा पार केला.