

रायपूर; वृत्तसंस्था : अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रसीख सलामने 2 धावा वसूल करत आरसीबीला यंदाच्या हंगामातील सर्वात रोमांचक विजय मिळवून दिला आणि याच निकालासह मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हानदेखील संपुष्टात आले. शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावा आवश्यक असताना राज बावाने 4 वाईड व 1 नोबॉलची खैरात दिली. याच षटकात भुवनेश्वरने खेचलेला उत्तुंग षटकार देखील जणू आरसीबीचे विजयाचे बुलंद इरादेच अधोरेखित करणारा ठरला!
प्रारंभी, तिलक वर्माच्या 57 धावांच्या झुंजार खेळीनंतरही मुंबईला 7 बाद 166 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात रसिखने डावातील शेवटच्या चेंडूवर आवश्यक 2 धावा घेत निसटत्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर आरसीबीच्या गोटात खुशीची एकच लहर उमटली. रसीखने 2 धावा वसूल करताच आरसीबीच्या डगआऊटमधील हर एक सदस्य थेट मैदानावर आला आणि रसीखभोवती गराडा घालत त्यांनी थाटात विजयाचा जल्लोष साजरा केला. कृणालच्या 73 धावाही यात महत्त्वाच्या ठरल्या.
प्रारंभी, तिलक वर्माने 57 धावांची झुंज दिली असली तरी, भुवनेश्वर कुमारच्या (4/23) धारदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने मुंबईला 7 बाद 166 धावांवर रोखले.