पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमधील टी-20 फॉर्मेट आणि थरार हे एक समीकरण आहे. सामन्यात नेमकं काय घडेल? हे शेवटच्या क्षणांपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही. याच थरारामुळे क्रिकेटप्रेमीमध्ये हे फॉर्मेट कमालीचे लोकप्रिय झाले आहे. मात्र आता क्रिकेटच्या इतिहासात कधीच घडलं नाही, असे कर्नाटकात सुरू असलेल्या देशांतर्गत T20 लीगमध्ये घडले आहे. येथे महाराजा ट्रॉफीमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात झालेला सामना एक-दोन नव्हे तर तीन सुपर ओव्हरनंतर निकाल लागला. जाणून घेवूया सामन्यात नेमकं काय घडलं याविषयी...
महाराजा करंडक स्पर्धेत शुक्रवारी (दि.२३) बेंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स आमने-सामने होते. बेंगळुरू ब्लास्टर्स नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हुबळीच्या मोहम्मद ताहाने ३१, मनीष पांडेने ३३, अनिश्वर गौतमने ३० तर मनवंत कुमारने २७ धावा करत संघाला १६४ धावांपर्यंत पोहचले. प्रत्युत्तरात बंगळुरू ब्लास्टर्सने १६४ धावा केल्या. कर्णधार मयंक अग्रवालने ५४ तर सूरजने २६ आणि नवीनने १९ धावा केल्या. सामना टाय झाल्याने सुपर ओव्हरवर निकाल ठरणार होता.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १०-१० धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी ८-८ धावा केल्या. आता सामना निकाली काढण्यासाठी तिसरी सुपर ओव्हर खेळविण्यात आली.
तिसर्या सुपर ओव्हरमध्ये बंगळूरुने १२ धावा केल्या. मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील हुबळी टायगर्सला तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना निकाली काढण्यासाठी १३ धावांची गरज होती. मनवंत कुमारने पहिल्या चेंडूवर दोन धावा केल्या. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर एक चेंडू विनाधाव गेला. तर पुढचा चेंडू वाईड ठरला.. मनीषने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. हुबळी टायगर्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. मनवंतने लेग साईडवर चौकार मारत हुबळी टायगर्सचा विजय निश्चित केला.