

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौर्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. 22 जानेवारीपासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेने भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंडचा संघ या दौर्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी तीन सामन्यांची वन डे मालिकाही खेळणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज के. एल. राहुल या मालिकेचा भाग असणार नाही. खुद्द लोकेश राहुलने बीसीसीआय निवड समितीचे मुख्य अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडे विश्रांती मागितल्याचे वृत्त आहे. याआधी त्याने देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगत ब्रेक मागितला होता.
फिटनेस आणि मानसिक संतुलन याचा विचार करून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेनंतर या क्रिकेटरने विश्रांती घेण्याला पसंती दिल्याचे दिसते. पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, के. एल. राहुल याने इंग्लंड दौर्यावरील मालिकेतून ब्रेक मागितला आहे, पण तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल. या परिस्थितीत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत मुख्य विकेटकीपरच्या रूपात टीम इंडियाचा भाग असेल. संजू सॅमसनला बॅक विकेटकीपरच्या रूपात संघात स्थान मिळू शकते.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी खूपच निराश केले. यात लोकेश राहुल चमकला होता. ऑस्ट्रेलिया दौर्यात सर्वाधिक धावा करणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो तिसर्या स्थानावर राहिला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांतील सर्व सामने खेळताना त्याने 30.66 च्या सरासरीने 276 धावा केल्या होत्या. इंग्लंड दौर्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. लोकेश राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सिलेक्शनसाठी उपलब्ध असणार आहे, पण विजय हजारे ट्रॉफीत श्रेयस अय्यर धावांचा पाऊस पाडतोय त्यामुळे के. एल. राहुलऐवजी चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे. तसे झाले तर के. एल. राहुल आता थेट आयपीएलमध्येच खेळताना दिसेल.