

India Vs Pakistan Asia Cup 2025 :
आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानादरम्यान, हस्तांदोलन वाद निर्माण झाला होता. भारतीय कर्णधार आणि संघानं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानला चांगल्यात मिरच्या झोंबल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बहिष्कारांची भाषा करत ऐनवेळी शेपूट घातली होती. युएईविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघानं खेळणार नाही असं म्हणत नखरे केले होते. मात्र ऐवेळी त्यांनी सामना खेळला.
युएईविरूद्धच्या बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं ४१ धावांनी विजय मिळवला. त्यामुळं पाकिस्तान हा सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या पराभवानंतर यजमान युएईचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान सुपर ४ साठी पात्र झाल्यानं आता आशिया कपमध्ये अजून एक भारत - पाकिस्तान सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा सामना २१ सप्टेंबर रोजी दुबईत होण्याची शक्यता आहे.
आशिया कपमध्ये ८ संघांनी सहभाग घेतला होता. एका ग्रुपमध्ये ४ असे दोन ग्रुप करण्यात आले होते. सुपर ४ साठी दोन्ही ग्रुपमधील पहिल्या दोन संघांचा समावेश करण्यात आला होता. ग्रुप अ मध्ये भारतासोबत पाकिस्तान सुपर ४ साठी पात्र झाला आहे. भारतानं आपले दोन्ही सामने जिंकून ग्रुपमध्ये टॉप केलं आहे.
आता सुपर ४ मध्ये सहा सामने होणार आहेत. यामध्ये दोन्ही ग्रुपमधील प्रत्येकी २ संघ एकमेकांसोबत खेळणार आहेत. ग्रुप अ मधून पाकिस्तान आणि भारत दोन्ही संघ पात्र झाल्यानं त्यांचा सामना २१ सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात देखील भारतीय खेळाडू हस्तांदोलन टाळण्याची शक्यता आहे.
त्यामुळं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसाठी हा नाचक्कीचा विषय ठरला आहे. त्यामुळंच त्यांनी आशिया कपवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली.