नवी दिल्ली : यजमान भारताने सर्व आघाड्यांवर उत्तम वर्चस्व गाजवत बांगला देशचा दुसर्या टी-20 मध्येही धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांची ही टी-20 मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.
या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या भारताने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 221 धावांचा डोंगर रचला आणि बांगला देशला 9 बाद 135 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखून धरत मायभूमीत बांगला देशविरुद्ध सर्वात मोठा विजय नोंदवला. ही मालिका संपन्न झाल्यानंतर निवृत्त होत असलेल्या अनुभवी महमुदुल्लाहने 39 चेंडूंत 41 धावांसह एकाकी झुंज दिली.
भारतीय संघातर्फे संजू सॅमसनने काही उत्तम चौकार फटकावत जोरदार सुरुवात केली; पण नंतर तो फार काळ तग धरू शकला नाही. अभिषेक शर्मा व सूर्यकुमार यादव हे देखील स्वस्तात बाद झाल्याने भारताची एकवेळ 6 षटकांत 3 बाद 41 अशी पडझड झाली होती. मात्र, त्यानंतर नितीश रेड्डी (34 चेंडूंत 74) व रिंकू सिंग (29 चेंडूंत 53) यांनी चौथ्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले. पुढे हार्दिक पंड्याने 19 चेंडूंत जलद 32 धावा फटकावत डावाला आणखी आकार दिला.
भारत : 20 षटकांत 9 बाद 221. (नितीश रेड्डी 74, रिंकू सिंग 53, हार्दिक पंड्या 32).
बांगला देश : 20 षटकांत 9 बाद 135. (महमुदुल्लाह 41, वरुण चक्रवर्ती 2-19, नितीश रेड्डी 2-23).