

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ सातत्याने अपयशी होत असताना याचे खापर कर्णधार म्हणून हार्दिक पंड्यावर फोडले जात होते. आता याच पंड्याने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला आपण संघ सोडणार असल्याचे रितसर कळवले आहे. मी मानसिकद़ृष्ट्या प्रचंड तणावाखाली असून पूर्णपणे खचलेलो आहे, असे पंड्याने फ्रँचायझीला कळवल्याचे ‘आयपीएल’मधील एका वरिष्ठ सूत्राने म्हटले आहे.
हार्दिक पंड्याने 2024 मध्ये रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. यंदा संघ रसातळाला पोहोचत असतानाच पंड्याने फ्रँचायझीशी संपर्क साधला. मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफमधील स्थान हुकल्यानंतर संघ आणि हार्दिक यांच्यात परस्पर संमतीने वेगळे होण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजते.
दुसरीकडे, 2027 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सला नव्या दमाने सुरुवात करावी लागेल. तूर्तास तरी रोहित शर्मापेक्षा उत्तम कर्णधार दुसरा कोणीही नाही. 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा रोहित आजही ड्रेसिंग रूममधील सर्वात मोठा चेहरा आहे. भविष्याचा विचार करता, रोहितच्या मार्गदर्शनाखाली तिलक वर्माला उपकर्णधार करून तयार केले जाऊ शकते, असे संकेत आहेत.
नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले, हार्दिक 2024 मध्ये संघात परतला, तेव्हापासून त्याला मैदानावर सातत्याने चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या हंगामातही काहीच अपेक्षेप्रमाणे घडले नाही. अखेर त्याच्या संयमाचा बांध सुटला आहे. प्रत्येकाची दिशा वेगळी असल्याने हार्दिकला संघ सांभाळणे मानसिकद़ृष्ट्या कठीण झाले.
हार्दिक पंड्या आगामी काळात इतर संघासोबत ट्रेड करणार की, थेट लिलावात उतरणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, ऑगस्टपर्यंत त्याच्या पुढील वाटचालीचे चित्र स्पष्ट होईल. चेन्नई सुपर किंग्ज हा त्याच्यासाठी ट्रेडद्वारे चांगला पर्याय ठरू शकतो, अशीही चर्चा आहे.