

Hardik Pandya CSK Vs MI: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा १०३ धावांनी पारभव केला. हा मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने केलेला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.
सीएसकेचा संजू सॅमसनने दमदार शतक ठोकत संघाला २०७ धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईचे ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. मात्र दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनने नेटानं फलंदाजी करत ५४ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. चेन्नईने २०० टप्पा पार केल्यानंतर मुंबईवर चेस करताना दबाव होता. या दबावातून मुंबई काही सावरलीच नाही. त्यांचा डाव १९ षटकात १०४ धावात संपुष्टात आला.
दरम्यान, या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संघाच्या पराभवाची कारणे देखील सांगितली. त्याने पॉवर प्लेमधील संघाची कामगिरी पराभवाचं प्रमुख कारण ठरल्याचं सांगितलं. मुंबईकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी थोडा प्रतिकार केला. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी रचली. मात्र मुंबईचा संघ काही पराभवाच्या छायेतून सावरू शकला नाही.
हार्दिक याबाबत म्हणाला की, 'मला वाटतं की पॉवर प्लेमध्ये विकेट्स गमावणे खूप ट्रिकी असते. तुम्ही नेहमी चेस करत असता. मात्र यावेळी आम्ही यातून उभारी घेऊ शकलो नाही.'
हार्दिकला खेळपट्टीबाबत विचारले असता त्याने कारणे देणे टाळले. तो म्हणाला की, 'मी खेळपट्टी बदलली हे म्हणणार नाही. मी खेळपट्टीला दोष देणाऱ्यांपैकी नाही. त्यांनी फलंदाजी चांगली केली. त्यांनी २०७ धावा केल्या. याच खेळपट्टीवर केल्या. याच मातीत केल्या. आम्ही चांगली फलंदाजी करायला हवी होती.'
हार्दिक पुढे म्हणाला की, 'आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. मात्र संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी केली. त्याचवेळी त्यांचे फलंदाज त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ देत होते. त्यामुळं त्यांनी चांगली धावसंख्या उभारली. त्या खेळपट्टीवर सीएसकेने उभारलेली धावसंख्या ही मोठी होती. ही धावसंख्या चेस करण्यासाठी आम्हाला पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी करणे गरजेचे होते. मात्र असं काही घडलं नाही.'
चेन्नईविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईला आता पॉवर प्ले गाठण्यासाठी त्यांच्या सात सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यांचा पुढचा सामना हा हैदराबादविरूद्ध २९ एप्रिल रोजी होणार आहे.