पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले अभय सिंह हे अचानक प्रकाशझोतात आले. एक 'आयआयटी'मध्ये शिकलेला तरुण भक्ती मार्गाकडे ओढला गेला यावर सोशल मीडियावर बरीच खलीही झाली. त्यांची सर्वत्र 'आयआयटी' बाबा ( iit baba) अशी ओळखही झाली. त्यांचे मत हे काही जण प्रमाणही मानू लागले. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीतील बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान सामना कोण जिंकणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. पाकिस्तानचा संघच सामना जिंकणार, अशी भविष्यावणी त्यांनी केली. मात्र टीम इंडियांच्या खेळाडूंनी पाकिस्तानसारख्या कसलेल्या प्रतिस्पर्ध्याला एकतर्फी धूळ चारत दिमाखदार विजय मिळवला. त्यानंतर आता 'आयआयटी' बाबा हे सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहेत. ( India vs Pakistan Champions Trophy 2025 )
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी अभय सिंह यांनी भाकीत केले होते की, "काहीही झालं तरी पाकिस्तानचा संघ विजयी होणार आहे. विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी कितीही प्रयत्न केले तरी टीम इंडिया यावेळी जिंकणार नाही. जर मी नकार दिला तर भारत जिंकणार नाही. बघूया देव मोठा आहे की तुम्ही." विशेष म्हणजे रविवारी सामन्यापूर्वी आणि सामना सुरु असताना अभय सिंह यांचे हे भाकित सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. या व्हिडिओमुळे विराट कोहलीच्या चाहत्यांचाही मनात पराभवाची धास्ती होती. मात्र हे भाकित विराट कोहलीसह टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने चुकचं ठरवलं.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रविवारी (दि.२३)भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभूत केला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानी संघाला एकही संधी दिली नाही. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्व विकेट गमावून २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४३ व्या षटकात ४ विकेट गमावून २४४ धावा करून सामना जिंकला. अभय सिंह यांची भविष्यवाणी पूर्णपणे चुकीची ठरली. या सामन्यात विराट कोहलीसह संघातील सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. विराटने वनडे कारकिर्दीतील ५१ वे शतक झळकावले.
आयआयटी बाबांचे भाकित चुकलं आणि त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावरुन तुफान ट्रोल केले. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर आयआयटी बाबा अभय सिंह यांच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका वापरकर्त्याने त्यांचा फोटो शेअर करत पोस्ट केली की, "हरिस रौफनंतर विराट कोहलीने माझीही कारकीर्द संपवली." तर एकाने म्हटलं आहे की, "बाबा भोंदू निघाला, तो पाकिस्तानला जिंकवण्याचा प्रयत्न करत होता." एका वापरकर्त्याने अभय सिंह सर्व आयआयटीयनची प्रतिमा मलिन करत असल्याचा दावा केला आहे. अशा शेकडो पोस्टने अभय सिंह याच्या भाकिताची खिल्ली उडवली जात आहे.
भाकित चुकीचे ठरल्यानंतर, आयआयटी बाबांनी त्याच युट्यूबरशी पुन्हा कॉलवर बोलले. ते म्हणाले, 'आपण असे खेळतो, आपण स्वतःसाठी खेळतो.' कोणाच्याही भाकितेवर कधीही विश्वास ठेवू नये. तुमच्या मेंदूचा वापर करा.' अशाप्रकारे आयआयटी बाबा त्यांच्या स्वतःच्या भाकितावर भाष्य केले. यानंतर तो युट्यूबर त्यांना सांगतो की त्याची भाकित करणारी क्लिप आता सर्वत्र व्हायरल झाली आहे. पाकिस्तानी वाहिन्यांवरही त्याची चर्चा होत आहे. हे ऐकून आयआयटी बाबा मोठ्याने हसायला लागतात. सुमारे ४२ सेकंदांची ही क्लिप संपते.