

BCCI On Girlfriend Culture: सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात अनेक स्टार खेळाडूंच्या गर्लफ्रेंडची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पासून ते इशान किशन पर्यंत अनेक खेळाडू आपल्या गर्लफ्रेंडसोबत वावरताना दिसत आहे.
मात्र हेच रोमँटिक वावरणे बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता बीसीसीआयने या गर्लफ्रेंड कल्चरबाबत कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे. या वृत्तानुसार बीसीसीआय याच्या दूरगामी परिणामांबाबत चिंतेत आहे. तसेच एखादा मोठा वाद उद्भवण्यापूर्वी किंवा अंतर्गत माहिती लीक होण्यापूर्वी स्पष्ट नियम करणे योग्य होईल अशी भूमिका बीसीसीआयची आहे.
यंदाच्या हंगामात आधीच काही वाद समोर आले आहेत. राजस्थानचा मॅनेजर रोमी भिंडर यांचे मोबाईल प्रकरण असो वा कर्णधार रियान परागचे इलेक्ट्रिक सिगारेट ओढण्याचे प्रकरण असो त्यामुळं आधीच वातावरण तंग बनलं आहे. बीसीसीआयला आता या वाढत्या गर्लफ्रेंड कल्चरबाबत आधीच काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं वाटत आहे. गर्लफ्रेंड कल्चरबाबतचे नियम हे पुढच्या हंगामात लागू होण्याची शक्यता आहे.
दैनिक जागरणमधील वृत्तात दावा केला आहे की बीसीसीआयने हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यासारख्या खेळाडूंबाबत दखल घेतली आहे. हे सर्व खेळाडू आयपीएलदरम्यान, त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत दिसले होते. बीसीसीआयला खेळाडूंनी कोणाला डेट कारवं आणि कोणाला नाही याबाबत काही तक्रार नाहीये. मात्र काही पार्टनर्स हे खेळाडूंसोबत राहतात आणि त्यांच्यासोबतच प्रवास करतात. त्या गर्लफ्रेंड संघासोबत देखील प्रवास करतात. अनेक केसमध्ये हे पार्टनर्स वेगवेगळ्या शहरात खेळाडूंसोबत प्रवास करताना दिसले आहेत. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
वृतात दावा करण्यात आला आहे की, 'बीसीसीआयमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांना पत्नी आणि फॅमिली मेंबर्सनी खेळाडूंसोबत प्रवास केला तर बीसीसीआयला काही समस्या नाही. मात्र ज्यावेळी गर्लफ्रेंड्स खेळाडूंसोबत प्रवास करतात त्यावेळी ती गंभीर बाब आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये खेळाडूंसोबत गर्लफ्रेंड्सना थांबण्याची परवानगी नव्हती. मात्र आता हा ट्रेंडच होत आहे.'
'बीसीसीआय पदाधिकाऱ्याने भ्रष्टाचार विरोधी पथकातील एका सदस्याला याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत पत्नी किंवा अधिकृत गर्लफ्रेंड्सना याबाबत परवानगी दिलेली नाही.'
ज्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत सपाटून मार खाल्ला त्यानंतर बीसीसीआयने अनेक कडक प्रोटोकॉल लागू केले. जर दौरा ४५ दिवसापेक्षा जास्त मोठा असेल तर खेळाडूला कुटुंबियांसोबत फक्त एक आठवडा राहता येईल. आता अशाच प्रकारचे एखादे धोरण आयपीएलमध्ये देखील लागू करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात बीसीसीआयला संघातील खेळाडूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सहज शक्य असते. मात्र आयपीएलमध्ये १० फ्रेंचायजी असल्याने हेच काम खूप जिकिरीचे होऊन जाते.