पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली आणि गौतम गंभीर ही दोन नावे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खास आहेत. दोघांनीही भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य असे योगदान दिले आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या दिग्गज खेळाडूंमधील मैदानावरील मतभेद आणि मैदानाबाहेरील ईर्ष्या नेहमीच क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला हाेता. दोघांनीही एकमेकांवर केलेली अप्रत्यक्ष टीका असो की आयपीएल सामन्यावेळी मैदानावरील भिडणे याची सामन्यातील कामगिरीपेक्षा अधिक चर्चा होत असे. आता हेच दोघे एकमेकांची मुलाखत घेत आहेत, असा प्रसंग पाहण्यास मिळेल, अशी कल्पनाही कोणी केले नसेल. मात्र हे आता वास्तवात आलं आहे. कारण दोघांचाही भूमिका बदलल्या आहेत. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तर विराट कोहली आजही टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे. आज (दि.१८) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) अधिकृत वेबसाइटवर गंभीर आणि कोहली यांनी एकमेकांची घेतलेली विशेष मुलाखतीचा टीझर रिलीज केला आहे. ( Kohli-Gambhir Interview ) या मुलाखतीत दोघेही त्यांच्या कारकिर्दीमधील चढ-उतारांबद्दल आणि त्यांच्या सहकारी क्रिकेटपटूंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलते झालेचे स्पष्ट होत आहे.जाणून घेवूया या विशेष मुलखातीमधील ठळक मुद्दे ...
या विशेष मुलाखतीत गंभीरने विराट कोहलीचा खास फॉर्म आणि ऑस्ट्रेलियातील बहुचर्चित कसोटी मालिकेतील खेळीवेळी झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली. यावेळी विराट कोहलीने विचारले की २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात गौतम गंभीरने द्विशतक झळकावताना संयम कसा राखला? या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी गंभीर 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोहलीच्या चमकदार कामगिरीबद्दल बोलण्यास उत्सुक दिसला. गंभीर म्हणाला, 'चांगला प्रश्न आहे. माझ्याबद्दल बोलण्याऐवजी, मला आठवते की, जेव्हा तू ऑस्ट्रेलियातील त्या मालिकेत खूप धावा केल्या होत्या, तेव्हा तू मला सांगत होतास की तू प्र प्रत्येक चेंडूपूर्वी 'ओम नमः शिवाय' मंत्र म्हणत होतास. "
२००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील गंभीरच्या खेळीचे विराटने स्मरण केले. अडीच दिवस चाललेल्या या खेळीदरम्यान ते 'हनुमान चालीसा' ऐकत होते. जेव्हा मी नेपियरमध्ये खेळलो तेव्हा तेच घडले. मी अडीच दिवस फलंदाजी केली. मला वाटत नाही की, मी पुन्हा असे करू शकेन. त्या अडीच दिवसात फक्त हनुमान चालीसाचे पठण केले, असे गंभीरने सांगितले.
यावेळी गौतम गंभीर म्हणाला की, "विराट हा देशाचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार आहे. मी समजू शकतो की, २५ वर्षांच्या असताना तू कोणत्या परिस्थितीतून गेला असशील. कसोटी सामने हे २० विकेट घेतल्यानंतरच जिंकले जातात. यासाठी तुमच्याकडे मजबूत गोलंदाजी हवी. भारताच्या कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळताना तू खरोखरच भेदक गोलंदाज शमी, बुमराह, इशांत, उमेश यादव अशी फळी तयार केलीस."