

IPL 2026 angkrish raghuvanshi obstructing the field controversy: आयपीएल २०२६ च्या ३८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. रिंकू सिंहने दमदार ८३ धावांची खेळी करत पंतच्या लखनौचा तोंडचा घास पळवला. मात्र या हाय व्होल्टेज सामन्यात एक वादग्रस्त निर्णय देखील देण्यात आला आहे.
केकेआरचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड या नियमाअंतर्गत बाद ठरवण्यात आलं. मात्र ज्यावेळी याचा व्हिडिओ चाहत्यांना पाहिला त्यावेळी सर्वांना धक्का बसला. केकेआरचा कोच अभिषेक नायरने देखील जाहीर नाराजी व्यक्त केली. अंगक्रिशने तर पंचांची हुज्जत देखील घातली.
केकेआर फलंदाजी करत असताना ५ व्या षटकात एक वादग्रस्त घटना घडली. प्रिन्स यादव हा रघुवंशीला गोलंदाजी करत होता. रघुवंशीने चेंडू मिड ऑनच्या दिशेला खेळला. त्याला एक चोरटी धाव घ्यायची होती. मात्र कॅमरून ग्रीनने त्याला अर्ध्या वाटेतून परत पाठवण्याचा निर्णय घेतला. रघुवंशी नकार मिळताच माघारी फिरला.
तो माघारी फिरून तीन ते चार पावले पुढे गेला असेल तोच मिड ऑनला उभ्या असलेल्या मोहम्मद शमीने थ्रो केला. मात्र हा थ्रो रघुवंशीच्या पायाला लागला. नकळत रघुवंशी मोहम्मद शमीच्या थ्रोच्या आडवा आला. ज्यावेळी चेंडू रघुवंशीच्या पायाला लागला त्यावेळी तो पाठमोरा होता. त्याने डाईव्ह मारून धावबाद होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला. तो त्यात यशस्वी देखील झाला.
मात्र लखनौचा कर्णधार आणि विकेटकिपर पंतने ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्डची अपील केली. मैदानावरील पंचांनी निर्णय थर्ड अंपायरकडं सोपवला. त्यांनी रघुवंशीला बाद ठरवलं अन् वादाला तोंड फुटलं. ८ चेंडूत ९ धावा करणाऱ्या रघुवंशीला बाद दिल्यानंतर केकेआरच्या कळपातील सर्वांनीच दंगा करण्यास सुरूवात केली. रघुवंशीने मुद्दाम फिल्डिंगमध्ये अडथळा निर्माण केला नव्हता. अंगक्रिशने देखील या निर्णयाविरूद्ध नाराजी व्यक्त केली. मात्र रघुवंशी खरंच बाद होता की नाही...?
आयपीएल नियम ३७.१.४ नुसार जर पंचांना असं वाटलं की फलंदाज हा रनिंग बिटविन द विकेट्सवेळी जर विनाकारण आपली दिशा बदलत आहे आणि यामुळं जर रन आऊटवेळी फिल्डिंगला अडथळा निर्माण होत आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी अपील केली तर पंचांनी त्याला ऑब्स्ट्रॅक्टिंग द फिल्ड अंतर्गत बाद ठरवायला हवं. अशा परिस्थितीत फलंदाज धाबवाद झाला असता की नसता हा मुद्दा गौण आहे.
रघुवंशीबाबत घडलेली ही घटना काही आयपीएल पहिली घटना नाहीये. यापूर्वी २०१३ च्या हंगामात पुणे वॉरियर्स आणि केकेआर विरूद्धच्या सामन्यात युसूफ पठाण देखील या नियमाचा बळी ठरला होता. असाच किस्सा अमित मिश्राच्या बाबतीत २०१९ मध्ये घडला होता. तर २०२४ मध्ये रविंद्र जडेजा देखील याचा शिकार झाला होता.