

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार वर्षांपासून टीम इंडियासोबत प्रवासी क्रिकेटपटू बनून राहिलेला अभिमन्यू ईश्वरन हा निराश झाला असला तरी तो बघत असलेले स्वप्न लवकरच साकार होईल अशी आशा त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्यासाठी खूप आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, 4 वर्षे उलटूनही त्याला पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या 4 वर्षांत 15 खेळाडूंना भारतीय कसोटी संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे, पण अभिमन्यू ईश्वरनचा नंबर अजूनही लागलेला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून त्याने बरेचदा भारतीय संघात स्थान मिळवले आहे, पण त्याला कसोटी संघासाठी पदार्पण करता आलेले नाही.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार्या भारतीय संघाने या मालिकेत दमदार कामगिरी केली. ही मालिका 2-2 ने बरोबरीत समाप्त झाली. या मालिकेसाठी प्रामुख्याने युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. ज्यात अभिमन्यू ईश्वरनचा देखील समावेश होता, पण त्याला 5 पैकी एकाही सामन्यात संधी दिली गेली नाही. अभिमन्यू ईश्वरनचा इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही 2021 ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते.
विक्की लालवानीच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अभिमन्यू ईश्वरनचे वडील रंगनाथन म्हणाले, त्याला संधी न मिळाल्याने तो नाराज होता. मी त्याला कॉल केला, त्यावेळी तो मला म्हणाला, पप्पा मला अजूनही संघात स्थान मिळालेलं नाही. मी आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बंगळूरला जाणार आहे. तिथे तो 10 ते 12 दिवस राहणार. त्यानंतर डेहराडूनला परतणार. तो चिंताग्रस्त असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. तरी तो म्हणाला, मी 23 वर्षांपासून हे स्वप्न जगतोय. एक-दोन सामन्यांत निवड न झाल्याने हे स्वप्न तुटणार नाही.
गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. अभिमन्यूच्या वडिलांनी गौतम गंभीरचा देखील उल्लेख केला. त्यांनी अभिमन्यू ईश्वरनला सांगितलं आहे की, तू खूप चांगली कामगिरी करत आहेस. तुला खूप मोठी संधी मिळेल. मी तुला 1-2 सामने खेळून बाहेर करणार नाही. गंभीरने अभिमन्यू ईश्वरनला विश्वास पटवून दिला आहे की, त्याला भारतीय संघात लवकरच संधी मिळू शकते, पण त्याला संधी केव्हा मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.